IPL 2022, MI vs LSG: सचिन तेंडुलकरला वाढदिवसाची भेट नाहीच; लखनौच्या ‘पंच’ने पराभवाचा आठवा दणका, लाजिरवाण्या पराभवाने झाला खेळ खल्लास
लखनऊ सुपर जायंट्स (Photo Credit: PTI)

IPL 2022, MI vs LSG: केएल राहुल (KL Rahul) याचे नाबाद शतक आणि गोलंदाजांच्या अप्रतिम कामगिरीच्या जोरावर लखनौ सुपर जायंट्सने (Lucknow Super Giants) पराभवाच्या गर्तेमध्ये अडकलेल्या मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाला सलग आठव्या पराभवाचा दणका दिला आहे. लखनौने प्रथम फलंदाजी करून मुंबईला 169 धावांचे लक्ष्य दिले होते, पण युवा जोश आणि दिग्गज खेळाडूंनी भरलेल्या या संघाला हे आव्हान पेलले नाही. परिणामी संघ निर्धारित 20 षटकांत 8 बाद 132 धावाच करू शकला आणि संघाला 36 धावांनी लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला. तसेच फ्रँचायझीचा आयकन व मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला (Sachin Tendulkar Birthday) आयपीएलच्या 15 व्या हंगामातील पहिल्या विजयाची भेट देऊ शकला नाही. अशाप्रकारे लखनौने पाचवा सामना खिशात घातला आहे. खराब फलंदाजी पुन्हा एकदा संघाला नडली. मुंबईसाठी तिलक वर्माने 38 धावा केल्या. तर कर्णधार रोहित शर्माने सर्वाधिक 39 धावांचे योगदान दिले. पण संघाला विजय मिळवून देईल असा एकही फलंदाज अपेक्षांवर खरा उतरला नाही. (Mumbai Indians 8th Loss in IPL 2022: ‘या’ धुरंधर खेळाडूंनी डुबवली मुंबई इंडियन्सची नौका, आठव्या पराभवासह 15 व्या पर्वात ‘पलटन’चा गेम ओव्हर!)

लखनौच्या 169 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ईशान किशनने मुंबई इंडियन्सची सुरुवात अतिशय संथ फलंदाजी केली आहे. किशनने कर्णधार रोहित शर्मासोबत पॉवरप्ले मध्ये संघाला आश्वासक सुरुवात करून दिली. पण किशन 20 चेंडूत 8 धावा काढून बाद झाला. त्यानंतर मुंबईचा युवा स्टार डेवाल्ड ब्रेविस अवघ्या 3 धावाच करू शकला. तर रोहित 39 आणि सूर्यकुमार यादव 7 धावांवर बाद झाला. किरॉन पोलार्ड आणि तिलक वर्माच्या जोडीने संथ फलंदाजी करून धावफलक हलता ठेवला. मुंबईच्या गेल्या सामन्यात अर्धशतकी पल्ला गाठलेल्या तिलक आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील खतरनाक फिनिशर पोलार्डकडून मुंबईला निर्णायक क्षणी आक्रमक फलंदाजी अपेक्षित होती. अडचणीच्या पोलार्ड आणि तिलकने अर्धशतकी भागीदारी करून संघाच्या विजयाच्या अशा पल्लवित ठेवल्या. पण लखनौच्या शिस्तबद्ध गोलंदाजीपुढे दोघे हतबल ठरले. लखनौसाठी कृणाल पांड्याने सर्वाधिक 3 तर मोहसीन खान, रवी बिष्णोई आणि आयुष बडोईनी यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

यापूर्वी कर्णधार केएल राहुलच्या नाबाद शतकाच्या जोरावर लखनौने प्रथम मुंबईविरुद्ध 168 धावांपर्यंत मजल मारली. राहुलने नाबाद 103 धावांची धडाकेबाज खेळी खेळली. यादरम्यान त्याने 12 चौकार आणि 4 षटकार मारले. आयपीएल 2022 मधील राहुलचे दुसरे आणि एकूण चौथे शतक आहे. राहुलनंतर मनीष पांडेने सर्वाधिक 22 धावा केल्या. दुसरीकडे, मुंबईकडून किरॉन पोलार्ड आणि रिले मेरेडिथने 2-2 बळी घेतले. यासह मुंबईच्या आता प्लेऑफ गाठण्याच्या आशा संपूर्णपणे खल्लास झाल्या आहेत.