IND vs WI 3rd ODI: विराट कोहलीने श्रेयस अय्यर याला दिले विजयाचे श्रेय, स्वतःशी तुलना करत केले हे मोठे विधान
विराट कोहली आणि श्रेयस अय्यर (Photo Credit: @ICC/Twitter)

भारतीय क्रिकेट संघाला (Indian Team) मधल्या फळीत फार पूर्वीपासून फलंदाजाची गरज होती जो परिस्थितीनुसार फलंदाजी करेल आणि संघाला मोठा स्कोर उर्भारण्यास मदत करेल. आणि वेस्ट इंडिज (West Indies) विरुद्ध वनडे मालिकेनंतर टीम इंडियाचा हा शोध पूर्ण होताना दिसत आहे. सध्या चौथ्या क्रमांकाची समस्या जसतशी कायम आहे. या क्रमांकावर फलंदाजी करण्याचा प्रयत्न करीत असलेला विकेटकीपर फलंदाज रिषभ पंत (Rishabh Pant) सतत भेट म्हणून आपली विकेट बहाल करताना दिसतोय. पण, शेवटच्या दोन सामन्यांमध्ये पाचव्या क्रमांकावर असलेल्या श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याने त्याच्या कामगिरीने खूप प्रभावित केले आहे. (IND vs WI 2019: क्रिस गेल क्रिकेटमधून निवृत्त? 3rd वनडे नंतर 'युनिव्हर्स बॉस' ने केले हे मोठे विधान)

विंडीजविरुद्ध वनडे मालिकेत कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने सलग दुसरे शतक झळकावले. तिसऱ्या सामन्यात त्याने 99 चेंडूंत नाबाद 114 धावा केल्या. या मालिकेत आणखी एक खेळाडू ज्याची कामगिरी चर्चा सध्या सोशल मीडियावर देखील होत आहे. आणि तो आहे श्रेयस अय्यर, ज्याने मालिकेत सलग दोन अर्धशतके झळकावली आहेत. दुसर्‍या वनडे सामन्यात 71 धावा करणाऱ्या अय्यरने तिसर्‍या सामन्यात महत्त्वपूर्ण 65 धावा केल्या. कोहलीला स्वत: त्याच्या कामगिरीची खात्री पटली आहे. सामन्यानंतर कोहलीने अय्यरचे कौतुक केले आणि सांगितले की "कठीण परिस्थितीत कामगिरी करण्याचे महत्त्व त्याला समजते. जेव्हा मी टीम इंडियामध्ये आलो होतो तेव्हा मी देखील असच खेळत होतो. मला मिळालेल्या प्रत्येक संधीत मी संघाला विजय मिळवण्याचा प्रयत्न करायचो. दडपणाखाली श्रेयस धैर्याने खेळला. आपण कसे खेळता आणि कोणत्या प्रकारचे खेळाडू आहात हे आपणास स्वतः समजून घेणे आवश्यक आहे."

मधल्या फळीचा तिढ्यावर कोहली म्हणाला की, अय्यर जर अशीच कामगिरी करत राहिला, तर तो मधल्या फळीचा प्रबळ दावेदार असू शकतो. दरम्यान, भारताने टी-20 पाठोपाठ वनडे मालिकासुद्धा जिंकली. कोहलीचे शतक आणि अय्यरच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने तिसरा वनडे सामना जिंकला.