IND vs WI 2nd T20I: दुसऱ्या सामन्यात विराट कोहलीचे विंडीज गोलंदाजांवर वर्चस्व, 30 वे टी-20 अर्धशतक नंतर पाहा काय म्हणाला ‘किंग कोहली’ (Watch Video)
विराट कोहली (Photo Credit: PTI)

IND vs WI 2nd T20I: भारताचा स्टार विराट कोहलीने (Virat Kohli) शुक्रवारी कोलकाता (Kolkata) येथे दुसऱ्या टी-20 सामन्यात वेस्ट इंडिज (West Indies) विरुद्ध 30 व्या आंतरराष्ट्रीय टी-20 अर्धशतकादरम्यान त्याच्या सकारात्मक हेतूने आनंदी असल्याचे सांगितले. दुसऱ्या टी-20 सामन्यात 41 चेंडूत 52 धावा करणाऱ्या कोहलीने अष्टपैलू वेंकटेश अय्यर आणि रिषभ पंत या डावखुऱ्या जोडीचे कौतुक केले व त्यांनी सुंदर फलंदाजी केली ज्याने भारताला शेवटी त्या 10 अतिरिक्त धावा करण्यात मदत केल्याचे म्हटले. बऱ्याच दिवसांनी कोहलीच्या बॅटने मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये अर्धशतक झळकावले. विंडीजविरुद्ध दुसऱ्या सामन्यात विराटने दमदार अर्धशतक झळकावले. माजी कर्णधार बराच वेळ धावा काढण्यासाठी धडपडत होता. त्यामुळेच वेस्ट इंडिजविरुद्ध अर्धशतक झळकावल्यानंतर विराट कोहली म्हणाला की, स्वत:ला पाठिंबा देणे आणि आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवणे महत्त्वाचे आहे. (IND vs WI 2nd T20I: ईडन गार्डन्सच्या मैदानात विराट कोहली, Rishabh Pant यांचा अर्धशतकी धमाका, वेस्ट इंडिजविरुद्ध भारताचा 186 धावांचा डोंगर)

शेवटच्या सहा षटकांत भारताने त्यांच्या एकूण धावसंख्येमध्ये आणखी 76 धावा जोडल्या आणि धावसंख्या 180 धावांच्या पुढे नेली. “माझ्यासाठी, वेगवेगळ्या परिस्थितीत संघासाठी चांगली फलंदाजी करण्याची नेहमीच संधी असते, आज जेव्हा मी मैदानात उतरलो तेव्हा मी सकारात्मक होण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर आम्ही काही विकेट गमावल्या,” विराट कोहलीने भारतीय डावानंतर प्रसारकांना सांगितले. “मला त्याच प्रकारे पुढे खेळायचे होते, कदाचित मी त्यावेळी बाहेर पडताना निराश झालो होतो कारण मी शेवटच्या 4-5 षटकांमध्ये आक्रमक खेळण्यासाठी चांगला सेट केला होता, जी माझी फलंदाजी आहे, ही माझी ताकद आहे. मला आनंद झाला की मी आज स्पष्ट हेतूने खेळलो, मी माझे शॉट्स वापरून पहावे की नाही याचा फारसा विचार केला नाही आणि तो यशस्वी झाला. माझ्यासाठी ती खेळी सुरू करण्याचा हा एक चांगला मार्ग आहे,” कोहली पुढे म्हणाला.

दरम्यान भारताचा माजी कर्णधार विराट कोहली दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी बीसीसीआयला फटकारल्याच्या स्फोटक पत्रकार परिषदेनंतर पहिल्यांदा प्रसारकांसमोर आला. आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये 30 व्या वेळी 50 पेक्षा अधिक धावा केल्यावर अखेरीस त्याने मीडियाचा सामना केला. भारताने ईशान किशन, रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांच्या विकेट गमावल्यानंतर कोहलीनेच दुसऱ्या टी-20 मध्ये 52 धावांची दमदार खेळी करून भारताचा डाव सावरला. त्यानंतर रिषभ पंत आणि व्यंकटेश अय्यर यांनी फटकेबाजी करून भारताला 186/5 धावसंख्येपर्यंत मजल मारून दिली. पंत यादरम्यान 52 धावा करून नाबाद परतला.