IND vs AUS: सूर्यकुमार यादवने केली विराट कोहलीची स्तुती, टीम इंडिया कॅप्टनच्या प्रॅक्टिस व्हिडीओवर दिली अशी प्रतिक्रिया
विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव (Photo Credit: PTI)

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीला (Virat Kohli) ट्रोल करणारे वादग्रस्त मिम लाईक केल्यामुळे मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) बऱ्याच टीकाकारांचे लक्ष वेधले. बीसीसीआय (BCCI) निवड समिती आणि 'पेपर कॅप्टन' कोहलीच्या विरोधात रोहित शर्मा एकट्याने उभे असल्याचे या पोस्टमध्ये दाखविण्यात आले होते. एमआय (MI) स्टारने नंतर हे ट्विट डिसलाईक केले असले तरी यादव आणि भारतीय कर्णधार यांच्यात फुट पडले असल्याच्या चर्चा सोशल मीडिया यूजर्समध्ये सुरु झाल्या. तथापि, बिनधास्त भारतीय फलंदाजाने कोहलीच्या अलीकडील पोस्टवर भाष्य करत अफवांवर ब्रेक लगावला. आगामी ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेसाठी सध्या सराव करणाऱ्या विराट कोहलीने शिक्षण सत्रातील एक व्हिडिओ क्लिप ट्विटरवर शेअर केली. यामध्ये मोहम्मद शामी आणि सिराजच्या गोलंदाजीवर विराट सराव करताना दिसतोय. कोहलीने व्हिडीओ पोस्ट करताना म्हटले की,‘मला कसोटी क्रिकेट अभ्यास सत्र आवडतं.’ (IND vs AUS 2020-21 Series: ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे मालिकेमध्ये 'या' 5 खेळाडूंच्या कामगिरीवर असेल सर्वांची नजर)

विराटच्या या ट्विटवर सूर्यकुमार यादवने प्रतिक्रिया देत म्हटले, ‘Energy, Fire Sound, can’t wait to watch Domination Fire.’आयपीएलच्या मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यातील मॅच दरम्यान मैदानावर कोहलीने सूर्यकुमारला टशन दाखवण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि लगेचच यूजर्समध्ये चर्चेचा विषय ठरला होता, पण सूर्यकुमारने विराटच्या स्लेजिंगवर लक्ष न देता धडाकेबाज खेळी करून संघाला विजय मिळवून दिला होता.

दरम्यान, येत्या 27 नोव्हेंबरपासून सुरु होणाऱ्या भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात तीन वनडे सामने, तीन टी-20 आणि चार कसोटी सामन्यांचा समावेश आहे. ऑस्ट्रेलियाच्या मागील दौऱ्यावर भारताने ऐतिहासिक विजय मिळवला असला तरी डेविड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथ यांच्या मालिकेत समावेशामुळे संघाला वेगळ्या आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे. तसेच कर्णधार विराट कोहली पहिल्या कसोटी सामन्यानंतर भारतात परतणार आहे. दुसरीकडे, गेल्या तीन वर्षांपासून सूर्यकुमारने स्थानिक आणि आयपीएलमध्ये दमदार कामगिरी केली असूनही त्याची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघात निवड झाली नाही. निवड समितीच्या या निर्णयावरही यूजर्सकडून टीका करण्यात आली होती.