Virat Kohli-Rohit Sharma Captaincy: ‘विराट कोहलीच्या जागी रोहित शर्माची टेस्ट कर्णधार म्हणून नियुक्ती केल्यास...’ पाकिस्तानच्या माजी कर्णधारने केला खुलासा
विराट कोहली आणि रोहित शर्मा (Photo Credit: Twitter/BCCI)

Virat-Rohit Captaincy Controversy: विराट कोहलीच्या (Virat Kohli) जागी भारताचा कसोटी कर्णधार म्हणून रोहित शर्माची (Rohit Sharma) नियुक्ती करणे ही वाईट कल्पना असेल कारण यामुळे चित्र स्पष्ट होईल की दोन्ही खेळाडूंमध्ये मैदानावर किंवा बाहेर तणाव असल्याचे स्पष्ट होईल असे मत पाकिस्तानचा माजी कर्णधार सलमान बट्टने (Salman Butt) मांडले आहे. कोहली आणि रोहित यांच्यातील कथित मतभेदाचे वृत्त गेल्या महिन्यात रोहितने टी-20 कर्णधारपद घेतल्यापासूनच येत होत्या. त्यानंतर बीसीसीआयने (BCCI) कोहलीची वनडे कर्णधार पदावरून हकालपट्टी करण्याचा आणि रोहितकडे काम सोपवण्याचा निर्णय घेतला, ज्यामुळे आधीच भडकलेल्या आगीत आणखी भर पडली. पण कोहलीने सर्व अफवांना पूर्णविराम दिला जेव्हा त्याने दावा केला की त्याच्यात आणि रोहितमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. पण तरीही अफवा पसरत आहेत की कोहली फ्लॉप झाला किंवा दक्षिण आफ्रिकेतील (South Africa Series) आगामी मालिकेत अपेक्षेप्रमाणे कामगिरी न केल्यास रोहितकडे भारतीय कसोटी संघाचे (India Test Team) कर्णधारपद देखील दिले जाईल. (BCCI अध्यक्ष सौरव गांगुलीचे विराट कोहलीवर मोठे वक्तव्य, म्हणाले- 'विराटचा Attitude चांगला, पण आजकाल भांडणं खूप करतो)

बट्ट मात्र कोहलीला कसोटी कर्णधार पदावरूनही काढून टाकण्याच्या बाजूने नाही. “ते व्हायला हवे, असे मला वाटत नाही; त्याचा काही फायदा होणार नाही. पण, ते होईल की नाही हे मी सांगू शकत नाही. तसे झाले तर त्यांच्यात तणाव असल्याचे स्पष्ट होईल. इतर सर्व भारतीय कर्णधारांमध्ये परदेशात सर्वाधिक सामने जिंकणाऱ्या कर्णधाराकडून कर्णधारपद हिरावून घेण्याचे दुसरे कोणतेही कारण असू शकत नाही,” बट्टने आपल्या यूट्यूब चॅनेलवर सांगितले. कोहली 66 सामन्यात 39 विजय आणि 16 पराभवांसह भारताचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार आहे. कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडियाने आतापर्यंत वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया (दोनदा) आणि श्रीलंका येथे मालिका जिंकल्या आहेत, तर यंदा इंग्लंडमध्ये पुढे ढकलण्यात आलेल्या मालिकेत भारतीय संघ सध्या 2-1 ने आघाडीवर आहे.

कसोटी कर्णधार म्हणून कोहलीची उत्कृष्ट आकडेवारी पाहता बट्ट म्हणाला की, भारताने दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवला नसला तरीही त्याला पदावरून काढून टाकू नये कारण ते क्रिकेटसाठी धोकादायक असेल. “एका मालिकेचा त्याच्या कर्णधारपदावर परिणाम होऊ नये. तसे होईल असे मला वाटत नाही आणि ते जितके कमी झाले तितके चांगले. आणि जर ते वारंवार घडले तर ते क्रिकेटसाठी हानिकारक आहे,” बट्ट म्हणाला.