ICC WTC Final 2021: टीम इंडियाने कसली कंबर, न्यूझीलंड विरोधात फायनल लढतीसाठी सुरु केली तयारी (Watch Video)
टीम इंडियाने फायनलसाठी सुरु केली तयारी (Photo Credit: Twitter/BCCI)

ICC WTC Final 2021: आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (ICC World Test Championship) फायनल सामन्याचा काउंटडाउन सुरु झाला आहे. 18 जूनपासून सुरु होणाऱ्या फायनल सामन्यासाठी विराट कोहली (Virat Kohli) आणि टीम इंडियाने (Team India) कंबर कसली आहे. 3 जून रोजी इंग्लंडमध्ये दाखल झालेल्या भारतीय संघ (Indian Team) आयसोलेशमधून बाहेर आला असून त्यांनी न्यूझीलंडविरुद्ध अंतिम सामन्यासाठी पहिल्या मैदानी प्रशिक्षणाला सुरुवात केली आहे. बीसीसीआयने (BCCI) गुरुवारी सकाळी खेळाडूंच्या सराव सत्राचा व्हिडिओ शेअर  केला, ज्याने चाहत्यांचा उत्साह वाढला आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील फायनल मॅच 18 ते 22 जूनच्या दरम्यान साऊथम्पटनमध्ये होणार आहे. (ICC WTC Final 2021: ऐतिहासिक फायनल सामन्यापूर्वी ICC कडून अंपायरांची घोषणा, टीम इंडियासाठी हा अंपायर ठरला ‘अनलकी’)

बीसीसीआयच्या व्हिडिओमध्ये रिषभ पंत, अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, रोहित शर्मा टीम इंडियाचा नवीन रेट्रो स्वेटर परिधान करून नेट्समध्ये बॅटिंग सराव करताना दिसत आहे. याशिवाय, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, आणि मोहम्मद शमी देखील नेट्समध्ये गोलंदाजीचा सराव करताना दिसले. बुधवारी टीम इंडियानेही फिल्डिंग ड्रिलमधेही भाग घेतला आणि शुभमन गिलने स्लिपमध्ये कॅच पकडण्याचा सरावही केला. शुभमन गिलने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर मालिकेत चांगली कामगिरी केली होती ज्यामुळे त्याचा टीममध्ये समावेश होण्याची शक्यता आहे. बऱ्याच दिवसानंतर न्यूझीलंडविरुद्ध महत्त्वपूर्ण सामन्यासाठी भारताकडे त्यांची संपूर्ण खेळाडूंचा संघ उपलब्ध आहे. पण यामुळे आता कर्णधार कोहली आणि संघ व्यस्थापनावर फायनल मुकाबल्यासाठी अंतिम प्लेइंग इलेव्हन निवडण्याची डोकेदुखी वाढण्याची चिन्हे आहेत.

यापूर्वी, कर्णधार कोहलीने देखील आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शुभमन आणि चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) सोबतचा एक फोटो शेअर केला आहे. 'सूर्य हास्य फुलवतो,' असं कॅप्शन त्याने या फोटोला दिलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Virat Kohli (@virat.kohli)

18 ते 22 जून दरम्यान जागतिक कसोटी अजिंक्यपदाचा अंतिम सामना रंगणार आहे तर 23 जून हा रिझर्व दिवस आहे. पाच दिवसाचा खेळ पूर्ण झाला नाही तर या दिवशी खेळ होणार आहे. मात्र याबाबतचा अंतिम निर्णय मॅच रेफ्री घेतील. फायनल मॅच ड्रॉ किंवा टाय झाली तर दोन्ही टीमना संयुक्त विजेते म्हणून घोषित करण्यात येईल.