पुण्यातील 2 कोरोना बाधितांचे मृतदेह स्विकारण्यास नातेवाईकांनी दिला नकार, PMC कामगारांनी केले शवांवर अंत्यसंस्कार- पालिका आयुक्त शेखर गायकवाड
Coronavirus | Representative Image (Photo Credit: PTI)

कोरोना व्हायरस (Coronavirus) सारखा महाभयंकर विषाणू हळू हळू संपूर्ण महाराष्ट्रात पसरू लागला आहे. याचा परिणाम झपाट्याने रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ पाहत लक्षात येईल. त्यात महाराष्ट्रात सर्वात आधी कोरोना रुग्ण आढळलेल्या पुणे शहरात मागील 24 तासांत कोरोना बाधितांचा मृत्यू झाल्याची माहिती पुणे महानगरपालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली आहे. त्यामुळे सद्य स्थितीत पुण्यातील कोरोना बाधितांच्या मृतांची संख्या ही 13 वर जाऊन पोहोचली आहे. पुण्यात कोरोना बाधितांची संख्या 151 वर जाऊन पोहोचली आहे. पुणे शहरात दिवसेंदिवस वाढत जाणारी कोविड-19 रुग्णांची संख्या ही चिंतेचा विषय बनत चालली आहे.

सर्व परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणा आटोकाट प्रयत्न करत असताना पुणे महानगरपालिकेच्या कामगारांवर अशा परिस्थिती माणुसकी जपत सर्वांनी कौतुक करावे असे काम केले आहे. पुण्यात काल मृत्यू झालेल्या कोरोना रुग्णांचे मृतदेह त्यांच्या नातेवाईकांनी स्विकारण्यास नकार दिला. अशा वेळी PMC कामगारांनी स्वत:हा पुढाकार घेऊन माणुसकी जपत या मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले अशी माहिती पालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली आहे.

हेदेखील वाचा- पुणे: ससून हॉस्पिटलमध्ये कोरोनाबाधित रूग्णाचा मृत्यू; शहरातील Covid 19 मुळे बळींचा आकडा 10 वर

सर्व शासकीय यंत्रणा तसेच डॉक्टर, नर्स, पालिका कर्मचारी हे सर्व अहोरात्र या कोरोना बाधितांची सेवा करत आहेत. हा आजार पसरु नये आणि आपला पेशंट वाचावा यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत. हे करुन यातील प्रत्येक व्यक्ती आपले कर्तव्य निष्ठेने पूर्ण करत आहेतच मात्र अशा पद्धतीने नातेवाईंकाने नाकारलेल्या शवांचे अंत्यसंस्कार करुन माणुसकीचे उत्तम उदाहरण त्यांना लोकांसमोर ठेवले आहे.

महाराष्ट्रात वाढती कोरोनाबाधितांची संख्या आणि त्यासोबत वाढणारा मृत्यूदर यांच्याबाबत काही दिवसांपूर्वी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी चिंता व्यक्त केली होती. दरम्यान मुंबई, पुणे शहरात वाढती रूग्णसंख्या आरोग्ययंत्रणेवरही भार वाढवत असल्याने नागरिकांना अनावश्यक गर्दी टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. काल पुणे शहरामध्येही काही भागांत कर्फ्यूचे नियम कडक करत नागरिकांना अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी विशिष्ट वेळ पाळण्याची बंधनं घालण्यात आली आहेत.