गडकिल्ले भाड्याने देण्यात काहीच गैर नाही; त्याने नक्कीच अर्थव्यवस्था सुधारेल: उदयनराजे भोसले
छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज व भाजपचे नेते उदयनराजे भोसले यांनी मात्र या धोरणाला पाठिंबा दर्शवला आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत उदयनराजे यांनी हे धोरण कसे योग्य आहे यावर मत मांडले आहे.
राज्यसरकारने मध्यंतरी जाहीर केलेल्या गडकिल्ल्यांविषयीच्या धोरणावर राज्यभरातून टीका झाली होती. या धोरणानुसार महाराष्ट्रातील गडकिल्ले हे हॉटेल आणि लग्नसमारंभासाठी भाड्याने उपलब्ध करुन देण्यात येणार होते.
छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज व भाजपचे नेते उदयनराजे भोसले यांनी मात्र या धोरणाला पाठिंबा दर्शवला आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत उदयनराजे यांनी हे धोरण कसे योग्य आहे यावर मत मांडले आहे. ते म्हणाले, "गडकिल्ले भाड्याने उपलब्ध करुन देण्याच्या धोरणाला अनेक माध्यमांनी चुकीचे वळण दिले आहे. मी स्वतः पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्याशी या विषयावर चर्चा केली. त्यांनी मला सरकारचे हे धोरण पूर्णपणे समजावून सांगितले व या धोरणात किल्ल्यांचा काही भाग लग्न समारंभास भाड्याने द्यावा असं म्हटले आहे. मला यामध्ये काहीही गैर वाटत नाही."
सरकारच्या 'या' धोरणावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे भडकले, पाहा काय म्हणाले?
इतक्यावरच न थांबता, "आपण देवळात लग्न लावत नाही का? असा सवाल देखील उदयनराजेंनी विचारला. त्यांचं मत आहे की, "पर्यटनावर देशाची अर्थव्यवस्था अवलंबून असते. त्यामुळे गडकिल्ले भाड्याने दिल्यास आपली अर्थव्यवस्था सुधारेल."
या धोरणानुसार हेरिटेज टुरिझमला चालना मिळण्यासाठी एमटीडीसीने राज्यातील 25 किल्ल्यांची निवड केली आहे. आणि हे किल्ले 50 ते 60 वर्ष भाडेतत्वावर देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याची माहिती समोर येताच राज्यातील शिवप्रेमींनी मोठ्या प्रमाणात सरकारवर टीका केली होती.
(The above story first appeared on LatestLY on Oct 15, 2019 02:24 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

