'शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षाचे सरकार फार काळ टिकणार नाही' नारायण राणे यांचा महाविकास आघाडीला टोला
नारायण राणे (फोटो सौजन्य-ट्वीटर)

महाराष्ट्रात महाविकास आघाडीने (Maha Vikas Aghadi) सत्ता स्थापन केल्यानंतर विरोधीपक्षातील नेत्यांकडून या सरकारवर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहेत. यातच भाजपचे नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे ( Narayan Rane) यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. नुकतीच नारायण राणे यांची सिंधुदुर्गात (Sindhudurg) आयोजित पत्रकार परिषद पार पडली. दरम्यान त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखाली राज्यात आलेले महाविकासआघाडीचे सरकार फार काळ टिकणार नाही, असे वक्तव्य नारायण राणे यांनी केले आहे. तसेच हे तिन्ही पक्ष स्वार्थापोटी एकत्र आलेत असेही ते म्हणाले आहेत.

मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांत विविध विकासकामांना दिलेल्या स्थगितीमुळे नारायण राणे यांनी नव्या सरकारवर टीका केली. महाराष्ट्रात स्थापन झालेल्या नव्या सरकारने अनेक विकासकामांना स्थगिती दिली आहे. सत्ता बदल्यानंतर कोकणातील विविध विकासकामे देखील ठप्प झाली आहे. त्यामुळे या सरकारचे स्थगिती सरकार असे नामकरण करता येईल, असे नारायण राणे म्हणाले आहेत. तसेच हे पाहुणे सरकार आहे, ते फार काळ टिकणार नाही. तसेच हे सरकार केवळ स्वार्थासाठी एकत्र आले असल्याचे ते म्हणाले आहेत. हे देखील वाचा- 'कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाचा नामविस्तार “छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ” असा करा' मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची राज्यपालांकडे मागणी

राज्यात तीन पक्षांनी एकत्र येऊन सत्ता स्थापन केली. हे स्थापन झालेले सरकार कसे उपयुक्त नाही याची माहिती जनतेसमोर मांडणार आहोत. विकासाबाबत अन्याय सहन केला जाणार नाही. त्यासाठी येत्या 15 ते 18 डिसेंबर दरम्यान गाव बैठका घेतल्या जाणार, अशी माहिती नारायण राणे यांनी दिली.