माझा मळवट मीच पुसला, पण दुसऱ्या सौभाग्याचे वाईट झाले याचा आनंद मानणाऱ्यांची ही विकृतीच महाराष्ट्राच्या मुळावर; शिवसेनेची भाजपवर 'मार्मिक' शब्दांत टोलेबाजी
Uddhav Thackeray | (Photo Credits: Twitter)

मुख्यमंत्री पद आणि सत्तेचे समसमान वटप यावरुन सामना प्रतिष्ठेचा झाल्यानंत शिवसेना-भाजप (Shiv Sena - BJP) यांच्यात चांगलेच वितूष्ट आले आहे. मतभेत अत्यंत टोकाला गेले असून, शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस (NCP), काँग्रेस (Congress) या विरोधी पक्षांसोबतच मोट बांधत सत्तास्थापनेचा घाट घातला आहे. मात्र, हा घाट अद्यापतरी पूर्णत्वास न गेल्याने भाजपच्या गोटात आनंद आणि उत्साहाचे वारे संचारले आहे. शिवसेनेवरही टीका आणि खिल्ली असा वर्षाव होत आहे. या टीकेला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पक्षाचे मुखपत्र मानले जाणाऱ्या 'सामना' (Saamana) या दैनिकातून प्रत्युत्तर दिले आहे. सामनातील लेखात, 'ठरल्याप्रमाणे भाजप शब्दाला जागला असता तर परिस्थिती इतक्या थरास गेली नसती. माझा मळवट मीच पुसला, पण दुसऱ्या सौभाग्याचे वाईट झाले याचा आनंद मानणाऱ्यांची ही विकृतीच महाराष्ट्राच्या मुळावर आली आहे. हे सर्व कडू अनुभव आम्ही गेली अनेक वर्षे घेत आहोत. भाजपबरोबर अमृताच्या पेल्यातील विषाचा घोट आम्ही रिचवल्यावर आता महाराष्ट्रातील अस्थितरता संपवण्यासाठी 'निळकंठ' व्हायला आम्ही तयार आहोत, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी भाजपल सुनावले आहे.

काय म्हटले आहे सामनात?

ठरल्याप्रमाणे भाजप शब्दाला जागला असता तर परिस्थिती इतक्या थरास गेली नसती. शिवसेनेस जे ठरले आहे ते देणार नाही, भले आम्ही विरोधी बाकड्यांवर बसू हा डावपेचाचा भाग नसून शिवसेनेस पाण्यात पाहण्याचा दुर्योधनी कावा आहे. कोणत्याही परिस्थितीत महाहाष्ट्रात सत्तदा स्थापन होऊ द्यायची नाही व राजभवनाच्या झाडाखाली बसून पत्ते पिसत बसायचे हा सर्व खेळ महाराष्ट्राची जनता पाहात आहे. काँग्रेस किंवा राष्ट्रवादीबरोबर नक्की काय करायचे ते आम्ही पाहू. भाजपबरोबर अमृताच्या पेल्यातील विषाचा घोट आम्ही रिचवल्यावर आता महाराष्ट्रातील अस्थितरता संपवण्यासाठी 'निळकंठ' व्हायला आम्ही तयार आहोत. महाराष्ट्राच्या जनसेत सत्य माहीत असल्यामुळे आम्ही एका विश्वासाने काही पावले टाकली आहेत. शिवसेनेने सत्तास्थापनेचा दावा केला. पाठिंब्याची आवश्यक ती पत्रे वेळेत पोहोचू शकली नाहीत. 105 वाल्यांना अपयश आल्यावर पुढच्या पावलांना अडथळेयेणार हे गृहीत धरायलाच हवे. याचा अर्थ 105 वाल्यांनी जल्लोष करावा असा नाही. माझा मळवट मीच पुसला, पण दुसऱ्या सौभाग्याचे वाईट झाले याचा आनंद मानणाऱ्यांची ही विकृतीच महाराष्ट्राच्या मुळावर आली आहे. हे सर्व कडू अनुभव आम्ही गेली अनेक वर्षे घेत आहोत. अर्थात या सगळ्यांची पर्वा न करता आम्ही पुढे जात आहोत. (हेही वाचा, महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट टाळण्यासाठी आहेत हे चार पर्याय, ज्यावर होऊ शकतो गांभीर्याने विचार)

दोन किंव तीन पक्षांचे सूत जमल्याशिवाय सत्ता स्थापन होणार नाही हे माहीत असतानाही राजभवनातून चोवीस तासांची मुदत मिळते व त्यानंतर 105 वाल्यांकडून जो आनंदी आनंद साजरा केल्याची दृश्ये दाखवली जातात हे काही चांगले लक्षण नाही. राज्य स्थापन होणे यापेक्षा राज्य स्थापन न होणे यातच काहींना आनंदाचे भरते येताना दिसत आहे. आनंद कशात मानावा, दिलेल्या शब्दास जागल्याचा आनंद मानाव की महाराष्ट्र अस्थिरतेच्या खाईत ढकलल्याचा आनंद मानावा हे ज्याचे त्याला ठरवू द्या. जनता सर्वसाक्षी आहे. काँघ्रेस पक्ष असेल किंवा राष्ट्रवादी पक्ष असेल, प्रत्येकजण या स्थिती आपापले घोडे दामटवणार यात काही शंका नाही. पण घोड्यावर कुठे रिकीब आहे तर कुठे खोगीर नाही. घोड्यास एखाद्या रथास जुंपून पुढे जायचे म्हटले तर रथाचे चाक डगमगते आहे. रथाचे राहूद्या, पण टांग्याने तरी ठरवलेल्या मार्गाने जावे अशी लोकांची किमान अपेक्षा आहे. राज्यपाल हे सत्ताधारी पक्षाचेच असतात, पण किमानपक्षी त्यांनी स्वतंत्र वृत्तीने वागावे व घटनेतील उद्देशांचे करण्याची आणि कायद्याची बांधिकलकी पाळण्याची शपथ विसरु नये येवढी अपेक्षा आहे.