Mumbai Metro Car Shed: पर्यावरणप्रेमींना झटका; 'आरे कॉलनी' बाबत न्यायालयाच्या निर्णयानंतर ताबडतोब झाडे तोडण्यास सुरवात (Watch Video)
Aarey Colony (Photo credits: Video grab)

गेले कित्येक दिवस मुंबई मेट्रोच्या फेज 3 (Mumbai Metro) साठी आरे कॉलनी (Aarey Colony) येथे कारशेड (Car Shed) उभे राहण्याच्या मुद्द्यावरून वाद चालू होता. मात्र आता याबाबत पर्यावरणप्रेमींना मोठा झटका बसला आहे. मुंबईच्या आरे कॉलनी येथे मेट्रो कार शेडच्या बांधकामाविरोधात दाखल केलेल्या चार याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावल्या आहेत. यामुळे मेट्रोचा तिसरा टप्पा कफ परेड ते सीप्जसाठी आरे मेट्रो कारशेडपर्यंतचा 33.5 किमीचा प्रवास सोपा झाला आहे. आजच्या न्यायालयाच्या निकानंतर अधिकाऱ्यांनी ताबडतोब ही झाडे तोडण्यास सुरवात केली आहे. टाईम्स ऑफ ईंडियाने याबाबतचा व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे.

पहा व्हिडीओ -

मुंबई मेट्रोच्या फेज 3 साठी आरे कॉलनी येथे कारशेड उभारण्याचा प्रस्ताव आहे. मात्र त्यासाठी या परिसरातील हजारो झाडे तोडण्यात येणार आहेत. याबाबत सरकारने आपला विचार बदलावा म्हणून पर्यावरणप्रेमींनी कोर्टात धाव घेतली होती. कोर्टात आतापर्यंत एकूण चार याचिका दाखल करण्यात आल्या होत्या, ज्या आता न्यायालयाने फेटाळून लावल्या आहेत. आरे कार शेडच्या विरोधातील तिसर्‍या याचिकेनुसार, या भागातील 2646 झाडे तोडल्याने मुंबईत ऑक्सिजनची कमतरता निर्माण होईल असे सांगण्यात आले होते. परंतु कोर्टात ही झाडे तोडण्यापूर्वी 24000 झाडे लावण्याच्या युक्तिवाद, तसेच नवीन झाडांमुळे जास्त ऑक्सिजन मिळू शकतो हा युक्तिवाद मान्य करण्यात आला.

चौथ्या याचिकेमध्ये कारशेड हे फक्त टर्मिनसजवळच बनवू शकतो, त्यामुळे आरे कॉलनीची जागा कारशेडसाठी योग्य नसल्याचे सांगण्यात आले होते. शहरातील वाढती रहदारी आणि प्रदूषण पाहून बॉलिवूडमधील बर्‍याच कलाकारांनीही आरे कॉलनीमधील झाडे तोडली जाऊ नयेत असा पवित्रा घेतला होता. मात्र अखेर न्यायालयाने मंजुरी दिल्याने आरे परिसरातील झाडे तोडण्यास सुरुवात झाली आहे. (हेही वाचा: Aarey कॉलोनी तील 2700 झाडे वाचवण्यासाठी वसीम जाफर याची बॅटिंग, ट्विटरवर पोस्ट शेअर करत केला बीएमसीच्या आदेशाचा विरोध)

दरम्यान, सरकारच्या योजनेनुसार कापलेल्या झाडांऐवजी नवीन झाडे लावण्याचीही योजना आहे. शहरातील वाढती रहदारीची समस्या आणि मुंबईच्या गरजेसह सहजगत्या वाढणार्‍या गाड्यांची संख्या रोखण्यासाठी मेट्रो बांधकाम हा एक मार्ग आहे. अनेक लोकांनी त्याचे स्वागतही केले आहे. स्वतः मुख्यमंत्र्यांनी ही भविष्यातील चांगली सोय असल्याचे म्हटले आहे.