Mumbai Eases Covid-19 Restrictions: मुंबईमध्ये कोरोना निर्बंधामध्ये शिथिलता; रात्रीचा कर्फ्यू हटवला, थीम पार्क-स्विमिंग पूल 50 टक्के क्षमतेने सुरु, जाणून घ्या नवे नियम

कोरोनाचा संसर्ग सातत्याने कमी होत असल्याने निर्बंध शिथिल करावेत, अशी मागणी मुंबईतील व्यापारी आणि उद्योजकांकडून सातत्याने केली जात होती. हे लक्षात घेऊन बीएमसीने मंगळवारी निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेतला

Mumbai Eases Covid-19 Restrictions: मुंबईमध्ये कोरोना निर्बंधामध्ये शिथिलता; रात्रीचा कर्फ्यू हटवला, थीम पार्क-स्विमिंग पूल 50 टक्के क्षमतेने सुरु, जाणून घ्या नवे नियम
The BrihanMumbai Municipal Corporation (BMC) (Photo Credits: Facebook)

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोना विषाणू (Coronavirus) रुग्ण कमी होऊ लागले आहेत. या पार्श्वभुमीवर सरकारने कोविड निर्बंधांमध्ये शिथिलता देण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये 90% पेक्षा जास्त लोकांना पहिला डोस देण्यात आला आहे आणि 70% पेक्षा जास्त लोकांना दुसरा डोस देण्यात आला आहे, अशा जिल्ह्यांमध्ये ही सूट देण्यात आली आहे. सरकारने याबाबत नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. मुंबईमध्येही (Mumbai) गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्या 1 हजाराच्या खाली आहे. अशात शहरात सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. बीएमसीने (BMC) मुंबईतील निर्बंधामध्ये शिथिलता आणली आहे.

बीएमसीने याबाबत मार्गदर्शक तत्वे जारी केली आहे-

    • शहरातील रात्रीची संचारबंदी उठवली आहे.
    • चित्रपटगृहे, नाट्यगृहे, रेस्टॉरंट्स आणि बारना 50 टक्के क्षमतेने पुन्हा सुरू करण्याची परवानगी.
    • मुंबईत आता 50 टक्के क्षमतेने जलतरण तलाव, वॉटर पार्क सुरू होऊ शकणार.
    • मनोरंजन पार्क आणि थीम पार्क 50 टक्के क्षमतेने खुले राहतील.
    • स्थानिक पर्यटन स्थळे, बीचेस नेहमीप्रमाणे सुरू होतील.
    • आठवडी बाजारही सामान्य दिवसांप्रमाणेच सुरू करण्यात यावेत, असे नव्या मार्गदर्शक तत्त्वात म्हटले आहे.
    • भजन, स्थानिक, सांस्कृतिक आणि करमणुकीच्या कार्यक्रमांना 50 टक्के क्षमतेने परवानगी असेल.
    • विवाहसोहळ्यादरम्यान, खुल्या मैदान आणि बँक्वेट हॉलच्या क्षमतेनुसार 25 टक्के पाहुण्यांना परवानगी दिली जाईल.
    • क्रीडांगणांमध्ये 25 टक्के लोकांची मर्यादा असेल. (हेही वाचा: राज्य सरकारकडून निर्बध शिथिल, नियमावली एक फेब्रुवारीपासून लागू)

कोरोनाचा संसर्ग सातत्याने कमी होत असल्याने निर्बंध शिथिल करावेत, अशी मागणी मुंबईतील व्यापारी आणि उद्योजकांकडून सातत्याने केली जात होती. हे लक्षात घेऊन बीएमसीने मंगळवारी निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेतला. मात्र, या सर्व सवलती लोकांच्या लसीकरणाच्या अटींच्या आधारे देण्यात आल्या आहेत. दरम्यान, मुंबईमध्ये आज कोरोना विषाणूच्या 803 रुग्णांची नोंद झाली असून, आज 1800 रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले सध्या शहरामध्ये 8888 सक्रीय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. शहरातील रुग्ण दुप्पटीचा दर 485 दिवस झाला आहे.

(The above story first appeared on LatestLY on Feb 01, 2022 08:38 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).