मुंबई: कोरोनाच्या भीतीमुळे मूळ गावी परतण्यासाठी नागरिकांची रेल्वे स्थानकांवर तोबा गर्दी
LTT | Photo Credits: Twitter/ANI

कोरोनाचा विळखा जसा महाराष्ट्रात घट्ट होत आहे तशी त्याबद्दलची भीती नागरिकांची मनात वाढत आहे. अशामध्येच पुणे, मुंबई सारख्या मेट्रो शहरांमध्ये हातावर पोट असणार्‍या अनेक नागरिकांनी गावी आपल्या मूळ घरी परतण्याचा मार्ग निवडला आहे. राज्यामध्ये काल (20 मार्च) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई एमएमआरडीए रिजन, नागपुर, पुणे, पिंपरी चिंचवड या भागात अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सारी दुकानं, खाजगी कंपन्या, शाळा, कॉलेज बंद करण्याचा निर्णय घेतल्याने आता अनेकांनी मुंबई, पुणे ही शहरं सोडण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या 52 तर देशात 251 पर्यंत आकडा पोहचल्याने आता नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. मुंबई: येत्या 22 मार्चला ठेवण्यात आलेल्या 'जनता कर्फ्यू' मध्ये आवश्यकतेनुसार सार्वजनिक वाहतूक सुरु राहणार.

दरम्यान मुंबई, पुण्यातून नागरिकांना गावी जाण्यासाठी मध्य रेल्वेकडून काही विशेष गाड्या सोडण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आता अनेकांनी स्टेशनवर गर्दी केलेली पहायला मिळत आहे. काल मुंबईच्या लोकमान्य टिळक टर्मिनल्समधून उत्तर भारत, पश्चिम बंगाल तसेच दक्षिण भारतात जाणार्‍या लांब पल्ल्याच्या गाड्यांना अशाच प्रकारे गर्दी पहायला मिळाली. अनेकांकडे कंफर्म तिकीट असूनदेखील त्यांना गाडीत चढायला मिळालं नसल्याचं चित्र पहायला मिळालं आहे.

ANI Tweet

कोरोनाचा धोका टाळायचा असेल तर नागरिकांना सोशल डिस्टन्सिंग ठेवण्याचा खबरदारीचा उपाय सूचवण्यात आला आहे. रविवार 22 मार्च दिवशी नागरिकांना सकाळी 7 ते रात्री 9 या वेळेत घरीच राहून सरकारी यंत्रणेला सहकार्य करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून करण्यात आलं आहे.