Ram Mandir Bhumi Pujan : रामाचा वनवास संपला- राज ठाकरे

जवळपास ३ दशकांचा संघर्ष, शेकडो करसेवकांचं बलिदान आणि दोन पिढ्यांमधील राजकीय कार्यकर्त्यांचा त्याग ज्या एका मूर्त स्वप्नासाठी होता, त्या स्वप्नपूर्तीचा क्षण अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. आपल्या रामाचा वनवास संपला. उद्या राममंदिराचं अयोध्येत भूमिपूजन होणार, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

Ram Mandir Bhumi Pujan : रामाचा वनवास संपला- राज ठाकरे
MNS Chief Raj Thackeray | | (Photo Credits: Facebook)

राम मंदिराचे उद्या अयोध्येत (Ayodhya) भूमिपूजन होणार, स्वतंत्र भारताच्या इतिसाहातील जे काही मोजके मंगलमय क्षण आहेत त्यातील हा एक क्षण आहे अखेर आपल्या रामाचा वनवास संपला, अशा शब्दात महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी राम मंदिर भूमिपूजन (( Ram Mandir Bhumi Pujan)) कार्यक्रमावर प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक पोस्ट लिहीत राज ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

राज ठाकरे यांची सोशल मीडिया पोस्ट

जवळपास ३ दशकांचा संघर्ष, शेकडो करसेवकांचं बलिदान आणि दोन पिढ्यांमधील राजकीय कार्यकर्त्यांचा त्याग ज्या एका मूर्त स्वप्नासाठी होता, त्या स्वप्नपूर्तीचा क्षण अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. आपल्या रामाचा वनवास संपला. उद्या राममंदिराचं अयोध्येत भूमिपूजन होणार, स्वतंत्र भारताच्या इतिहासातील जे काही मोजके मंगलमय क्षण आहेत त्यातील हा एक क्षण आहे.

अयोध्येत उभं राहणारं राममंदिर हे नेहमीचं मंदिर नाही, ते प्रतीक आहे शतकानुशतकं हिंदू बांधवांच्या मनात सुरु असलेल्या त्राग्याचं, अगतिकतेचं, ते प्रतीक आहे कोट्यावधी हिंदू बांधवांच्या अचाट इच्छाशक्तीचं, सहनशीलतेचं आणि म्हणूनच ह्या क्षणाचं महत्व वेगळं आहे. (हेही वाचा, Ram Mandir Bhumi Pujan: लालकृष्ण आडवाणी यांची राम मंदिर भूमिपूजन कार्यक्रमाबाबत भावनिक प्रतिक्रिया म्हणाले..)

तीन दशकांचा संघर्ष साधा नव्हता, त्यात अनेक करसेवकांना आणि जनसामान्यांना जीव गमवावा लागला, आज त्या करसेवकांच्या आणि जनसामान्यांच्या आत्म्याला खऱ्या अर्थाने सद्गगती मिळेल. ह्यासाठी नेटाने न्यायालयीन लढाई असो की सर्वसहमतीचं वातावरण निर्माण करण्यासाठी श्री. नरेंद्र मोदी ह्यांच्या सरकारने जे प्रयत्न केले ते निश्चितच वाखाणण्यासारखे आहेत आणि त्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन.

अर्थात ह्या क्षणी स्व. बाळासाहेब ठाकरे ह्यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. आज ह्या मंगलप्रसंगी ते असायला हवे होते, त्यांना मनापासून आनंद झाला असता.

सध्या कोरोनाचं संकट आहे पण ज्या इच्छाशक्तीने कोट्यवधी भारतीयांनी राममंदिराचं स्वप्न पूर्ण करून दाखवलं त्याच इच्छाशक्तीच्या जोरावर कोरोनाच्या संकटावर मात करून भारत बलशाली होईल ह्याची मला खात्री आहे.

तमाम हिंदू बांधवांचं पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन. आपला नम्र, राज ठाकरे.

दरम्यान, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांनीही राम मंदिर भूमिपूजन सोहळ्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. लालकृष्ण आडवाणी यांनी आपल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे की, जीवनातील काही स्वप्न पूर्ण होण्यासाठी बराच वेळ लागतो. आज माज्या हृदयाच्या जवळचे एक स्वप्न पूर्ण होत आहे. अयोध्येत पंतप्रदान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे भूमिपूजन होत आहे. हा केवळ माझ्यासाठीच नव्हे तर, संपूर्ण भारतीयांसाठी अत्यंत ऐतिहासिक आणि भावनिक क्षण आहे.

(The above story first appeared on LatestLY on Aug 04, 2020 09:49 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).