मुंबई: धारावी मधील स्थलांतरित मजूरांची स्वगृही परतण्यासाठी धडपड; रेल्वे स्टेशनला जाणाऱ्या बसेससाठी लांबच लांब रांगा
धारावी (Photo Credits-ANI)

देशभरासह महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसागणिक वाढत चालला आहे. त्यामुळे नागरिकांना घरीच थांबण्यासह स्वत:सह परिवाराची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. परंतु लॉकडाउनमुळे हातावर पोट असणाऱ्या स्थलांतरित कामगार आणि मजूरांना याचा फटका बसला आहे. गेला दीड महिना उलटून गेला असला तरीही अद्याप उत्पादनाचे कोणतेच साधन नसल्याने त्यांनी आपल्या घरची वाट पकडली आहे. केंद्र सरकारने स्थलांतरितांसाठी आपल्या घरी जाण्यासाठी स्पेशल ट्रेनची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. याच दरम्यान आता धारावीत मधील स्थलांतरित मजूर स्वगृही जाण्यासाठी धडपड करत आहेत. त्यामुळे धारावीच्या परिसरात या मजूरांच्या लांबच लांबा रांगा लागल्याचे दिसून येत आहे. मजूरांनी रेल्वे स्टेशनला जाणाऱ्या बसची वाट पाहत ऐवढी मोठी रांग लावली असल्याचे सांगण्यात येत आहे.

मुंबईतील धारावीत कोरोनाग्रस्तांचा आकडा दीड हजारांच्या पार गेला आहे. धारावी परिसरात दररोज नव्याने कोरोनाचे रुग्ण आढळून येत असल्याने तेथे संपूर्ण खबरदारी घेण्यात येत आहे. तसेच परिसरात कोणत्याच कामांना परवानगी देण्यात आलेली नाही आहे. धारावीतील मुस्लिम नगर आणि मुकूंदनगरमध्ये आतापर्यंत कोरोनाच सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. आतापर्यंत डॉक्टरांच्या पथकांकडून धारावीतील हजारो लोकांचे स्क्रीनिंग करण्यात आले आहे. यामध्ये कोरोनाचा संभाव्य धोका असलेल्या लोकांना खबरदारीचा उपाय म्हणून क्वारंटाईन करण्यात आले आहे.(Coronavirus in Maharashtra: मुंबई, ठाणे, पुणे या शहरांसह राज्यातील इतर जिल्ह्यात कोविड-19 चे किती रुग्ण? जाणून घ्या कोरोना बाधितांची जिल्हानिहाय आकडेवारी एका क्लिकवर)

दरम्यान, राज्य सरकार स्थलांतरित मजूरांना आपल्या घरी पाठवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र दुसऱ्या बाजूला रेल्वेमंत्री महाराष्ट्र सरकारकडे स्थलांतरित मजूरांना पाठवायची यादीच तयार नसल्याचे म्हणत आहेत. त्यामुळे सध्या स्थलांतरित मजूरांसह कोरोनाच्या परिस्थिती बाबत विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे. परंतु कोरोनाचा काळ हा राजकरण करण्याचे नसून एकमेकांना सहाय्य करण्याचा असल्याचे सरकारच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.