Acid Attack: क्षुल्लक वादातून एका व्यक्तीने पाच जणांवर फेकले अॅसिड; भिवंडी येथील धक्कादायक घटना
(Archived, edited, symbolic images)

क्षुल्लक वादातून एका व्यक्तीने 5 जणांवर अॅसिड फेकल्याची (Acid Attack) धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना महाराष्ट्राच्या ठाणे (Thane) जिल्ह्यातील भिवंडी (Bhiwandi) शहरात घडली आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी एका 37 वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. या घटनेत एकूण सात लोक जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. शनिवारी चार जखमींना डिस्चार्ज मिळाला, इतरांना अद्याप रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेने आजूबाजुच्या परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

भिवंडीतील ताडाळी साईनगर येथे निखिल शर्मा हा गुरुवारी रात्री कामावरुन घरी परतत असताना त्या परिसरातच राहणाऱ्या एका व्यक्तीचा धक्का लागल्याने मुलांच्या दोन गटात हाणामारी झाली होती. त्यानंतर निखिल शर्मासह त्याचे मित्र अभिषेक देशमुख, अभिषेक शर्मा, रोहित पांडे आणि सुरज पटेल हे का मारहाण केली याचा जाब विचारण्यासाठी त्या व्यक्तीच्या घरी गेले. तिथे त्यांच्यात बाचाबाची झाली आणि मुलांच्या दोन गटात हाणामारी झाली. त्यावेळी एका गटाकडून बेसावध असणाऱ्या या मुलांवर आरोपीने अॅसिड फेकले. ज्यात एकूण सात जण जखमी झाले असून यात एका महिलेचा देखील समावेश आहे, अशी माहिती इंडियन एक्स्प्रेसने आपल्या वृत्तात दिली आहे. हे देखील वाचा-Rape In Mumbai: मुंबई येथे दहा वर्षांच्या मुलीवर बलात्कार; आईच्या तक्रारीनंतर जन्मदात्या पित्याला अटक

दरम्यान, स्थानिक नारपोली पोलिसांनी या जखमी युवकांचे जबाब नोंदवून तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. तसेच या हल्ल्यात जखमी झालेल्या लोकांना स्वर्गीय इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.