Maharashtra Weather Forecast: राज्यात 20 जानेवारी पासून किमान तापमान घट होण्याची शक्यता; मुंबई, ठाण्यात 16° चा अंदाज
Winter | Photo Credits Twitter

महाराष्ट्रात यंदा ऐन हिवाळ्याच्या ऋतूमध्ये अनेक ठिकाणी लोकं घामांच्या धारा गाळत असल्याचं चित्र पहायला मिळायलं होतं. दरम्यान यंदा थंडीच्या ऋतूमध्येही दरवर्षी प्रमाणे वातावरणात गारवा अनुभवता आलेला नाही. त्यामध्येच अवकाळी पाऊस बरसरल्याने ऋतूचक्र बदललं आहे. पण हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, IMD GFS मोडेल नुसार, महाराष्ट्र राज्यात 20 जानेवरी पासून किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे. या अंदाजपत्रकानुसार विदर्भामध्ये काही ठिकाणी तापमान 10 अंश सेल्सियस पर्यंत खाली जाणार आहे. मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राच्या काही भागामध्ये हेच तापमान 14 अंश सेल्सियस पर्यंत खाली जाईल तर मुंबई - ठाणे परिसरात तापामानाचा पारा 16 अंश सेल्सियस पर्यंत खालावण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

दरम्यान सध्या उत्तर भारतामध्ये थंडीचा कडाका आहे. जम्मू कश्मिर, सिमला मध्ये बर्फवृष्टी होत आहे. तर राजस्थानमध्येही माऊंट अबू हा प्रदेश गोठल्याचं चित्र आहे. दिल्ली मध्ये देखील घनदाट धुक्याची चादर पहाटेच्या वेळेस पहायला मिळाते. त्यामुळे सध्या उत्तर भारतामध्येही जाणार्‍या ट्रेनचा वेग मंदावला आहे.

यंदा ऐन संक्रांतीला तिळगूळाचा आस्वाद घेताना मुंबई करांना घामाच्या धारा लगल्या होत्या. राज्यात मध्यंतरी 10 दिवसांपूर्वी 8 जानेवारीला अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने अवकाळी पाऊस बरसला होता. तर काही भागांत मेघगर्जनेसह काही जोरदार सरी कोसळल्याचं चित्रं पहायला मिळालं होतं. त्यामुळे किमान तापमान आणि कमाल तापमान वाढलं होतं. परंतू महाराष्ट्राला अद्यापही यंदाच्या थंडीच्या मोसमाची प्रतिक्षा आहे.