महाराष्ट्र एटीएसची मोठी कारवाई, औरंगाबाद, मुंब्रा येथून नऊ जण ताब्यात; आयएसआयशी संबध असल्याचा संशय
Anti-Terrorism Squad (file Photo)

प्रजासत्ताक दिनाच्या काही दिवस आगोदर महाराष्ट्र दहशतवाद विरोधीत पथकाने (Anti-Terrorism Squad)मोठी कारवाई केल्याचा दावा केला आहे. एटीएसने (ATS) मुंबई जवळील ठाणे (Thane) जिल्ह्यातील मुंब्रा (Mumbra) येथून चार तर औरंगाबाद (Aurangabad) येथून पाच अशा एकूण नऊ जणांना ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेण्यात आलेले नऊ जण पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (Popular Front of India) या बंगळुरु येथील संघटनेसाठी काम करत असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच, हे नऊ जण आयएसआय या दहशतवादी संघटनेच्या मॉड्यूलवर काम करत असल्याचा संशय आहे.

प्राप्त माहितीनुसार, मोहम्मद शेख, मोहसीन खान, फदाह शाह आणि तकी अशी मुंब्रा येथून ताब्यात घेण्यात आलेल्या तरुणांची नावे आहेत. हे सर्व तरुण शिक्षित आहेत. तसेच, पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया औरंगाबाद शाखेशी संबंधीत आहेत. या शाखाप्रमुखाचे नाव सलमान असे असल्याचे प्राथमिक वृत्त आहे. सलमान हा काही दिवसांपूर्वीच मुंब्रा येथे आला होता. तर, मुंब्रा येथून ताब्यात घेण्यात आलेल्या चौघांची भेट रमजान महिन्यात मस्जिदमध्ये रोजादरम्यान झाल्याचे पोलीस सूत्रांनी म्हटले आहे. त्यानंत हे चारही तरुण सातत्याने एकमेकांच्या संपर्कात होते. (हेही वाचा, उत्तर प्रदेशमध्ये ISIS चा चेहरा उघडकीस?)

दरम्यान, सलमान हा काही दिवसांपूर्वीच फहाद शेख याच्या घरी आला होता. तसेच, आपले लग्न असल्याचे सांगत तो त्याला औरंगाबादला घेऊन गेला होता. फहाद याच्यासोबत आणखी तिघेजण औरंगाबादला गेले होते. एटीएसने संशयीतांच्या घरावर छापा मारुन त्यांना ताब्यात घेतले. छाप्यावेळी पोलिसांनी मोबाईल फोन, सिम कार्ड आणि एक जुना लॅपटॉपही ताब्यात घेतला आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या सर्व संशयीतांना न्यायालयासमोर आज उभे करण्यात येणार आहे.