लवकरच विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु होणार असून सर्वच पक्ष कंबर कसून कामाला लागले आहेत. त्यात निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर पक्षांतर बदल सुरु झाले असून यात सध्याची स्थिती पाहता सर्वात मोठा फटका बसला तो राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP). त्यामुळे लोकसभा निवडणुकीत कोलमडलेल्या आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सावरण्यासाठी स्वत: पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) आता मैदानात उतरणार आहेत. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार पुढील आठवड्यापासून आपल्या राज्याव्यापी दौ-याला सुरुवात करणार असून या दौ-यामधून ते मतदारांशी संवाद साधतील.
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला अवघ्या चार जागा मिळून बॅक फूटवर गेलेल्या NCP चे भविष्य सरळसरळ उघड झाले होते. यातच पक्षातील अनेक दिग्गज नेत्यांनी पक्षाला रामराम करत दुस-या पक्षात प्रवेश केला होता. त्यामुळे डळमळीत झालेल्या राष्ट्रवादी पक्षाला पुन्हा तारण्यासाठी शरद पवारांनी पुन्हा रिंगणात उडी उतरणार आहेत. नाराज झालेल्या मतदार राजाच्या समस्या जाणून घेण्यासाठी ते पुढील आठवड्यापासून राज्यव्यापी दौ-याला सुरुवात करणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारने सलग दुस-यांदा मारलेली बाजी बघता भाजप पक्षाने इतर पक्षांना बाजूला सारत जोरदार मुसंडी मारत रिंगणात उडी मारली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अस्तित्त्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. परिणामी आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस कितपत आव्हान निर्माण करू शकेल, याबाबत शंकाच आहे.
हेदेखील वाचा-कोकणात शिवसेना अधिक बळकट, राष्ट्रवादीला धक्का; भास्कर जाधव यांचा आमदारकीचा राजीनामा, 'मातोश्री'वर बांधणार शिवबंधन
असे असतानाही राष्ट्रवादी पक्षासाठी आशेचा किरण असलेल्या शरद पवारांच्या राज्यव्यापी दौऱ्याने या पक्षाला उभारी मिळणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.