यंदा मुंबईकरांना पावसासाठी करावी लागणार प्रतीक्षा,तलाव आटल्याने पाणी टंचाईची शक्यता - 'SKYMET' Weather
मुंबईत यावर्षी वरुणराजाचे आगमन सुमारे दहा दिवस उशिराने होणार असल्याचा अंदाज स्कायमेट वेदर या खाजगी हवामान खात्याने वर्तवला आहे, यामुळे आधीच पाण्याची कमतरता भासत असणाऱ्या मुंबईकरांना येत्या काही दिवसात आणखीन समस्यांना तोंड द्यावे लागू शकते
मुंबईत (Mumbai) यावर्षी वरुणराजाचे आगमन सुमारे दहा दिवस उशिराने होणार असल्याचा अंदाज स्कायमेट वेदर (Skymet Weather) या हवामानाचा अंदाज व्यक्त करणारी खाजगी संस्थेने वर्तवला आहे. हिंदुस्थान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, दरवर्षी दक्षिण व पश्चिमी मान्सून (South West Monsoon)वारे हे केरळ (keral) मधून वाहून येत साधारण 8 ते 10 जून दरम्यान मुंबईत दाखल होतात मात्र यंदा हे वारे 15 ते 20 जून पर्यंत उशिराने वाहून येतील अशी माहिती स्कायमेटतर्फे सांगण्यात आली आहे.
मुंबई शहरात पावसाची सुरुवात साधारण मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात होते व जूनपर्यंत पावसाचा जोर वाढतो. मे महिन्यात सरासरी 11 मिलीमीटर पाऊस तरी हमखास असतोच मात्र यावर्षी उशिरा येणाऱ्या पावसाने हे गणित नक्कीच कोलमडून पडणार आहे. यामुळे आधीच पाण्याची कमतरता भासत असणाऱ्या मुंबईकरांना येत्या काही दिवसात आणखीन समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. आटलेली विहीर अजून खोदली, आता तासाला एक घागर पाणी; 2 हंडा पाण्यासाठी महिला रात्रभर रांगेत
मुंबईतील पाणी साठा असणाऱ्या प्रमुख सात तलावांत 12 मे पर्यंत केवळ 15% पाणी साठा उपलब्ध होता यावर तोडगा काढण्यासाठी महानगरपालिकेने शहरात 10% पाणी कपात देखील लागू केली आहे, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी माध्यमांना दिली. मुंबईलाही बसणार पाणीटंचाईच्या झळा?; सध्या धरणांत फक्त 22 टक्के पाणीसाठा शिल्लक
स्कायमेटच्या माहितीनुसार यंदा पावसाळा केवळ लांबणीवरच पडणार नसून जून आणि जुलै महिन्यात राज्यभरात कमी पाऊस पडून दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे असे देखील सांगितले जातेय. या दिरंगाईचे कारण स्पष्ट करताना 'El Niño' या हवामानातील परिस्थितीचा प्रभाव असल्याचं समोर येतंय. प्रशांत महासागरात तयार झालेल्या उष्ण तापमानामुळे कमी पर्जन्य आणि उष्णेतेची लाट राज्यात पसरू शकते. यामुळे सध्या तरी पावसासाठी अनुकूल असे कोणतेही बदल वातावरणात आढळून येत नसल्याचे स्कायमेटचे उपाध्यक्ष महेश पालीवत यांनी सांगितले आहे.
केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर केरळ मध्ये देखील पावसाचे आगमन उशिराने होण्याची 60% शक्यता आहे, या परिस्थितीत भारतीय महासागराच्या थंड वाऱ्यांनी El Niño चा प्रभाव कमी होऊन काही काळासाठी दिलासा मिळू शकतो मात्र ऑगस्ट किंवा सप्टेंबर उजाडेपर्यंत पावसाचे पुर्वव्रत स्वरूप पाहण्यासाठी प्रतीक्षा करायला लागू शकते.
(The above story first appeared on LatestLY on May 14, 2019 11:45 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

