'लवकरच बातमी कळेल' Pratap Sarnaik यांनी लिहिलेल्या पत्राविषयी Sanjay Raut यांचे महत्वाचे वक्तव्य
File Image Of Sanjay Raut | (Photo Credits: ANI)

शिवसेनेचे प्रवक्ते आणि आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना केंद्रीय तपास यंत्रणा आणि युतीसंदर्भात लिहिलेल्या पत्रावरून राज्यातील राजकारण पेटले आहे. याच मुद्द्यावरून शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली आहे. दरम्यान, संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्यात तब्बल दोन तास चर्चा झाली. या बैठकीनंतर संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी प्रताप सरनाईक यांनी लिहलेल्या पत्राविषयीही भाष्य केले आहे. तसेच प्रताप सरनाईक यांच्याविरोधात लवकरच बातमी कळेल, असे सूचक विधान संजय राऊत यांनी केले आहे.

संजय राऊत यांनी आज दुपारी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. तब्बल दोन्ही नेत्यांमध्ये मातोश्रीवर चर्चा झाली. बैठकीनंतर राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी प्रताप सरनाईक यांच्या पत्राविषयी भाष्य केले. म्हणाले की, "माझी प्रताप सरनाईक यांच्याशी मोबाईलवरून चर्चा झाली. माझ्याकडे त्यांनी खुलासा केला आहे. त्यांनी सांगितले की, 'मी माझ्या भावना व्यक्त केल्या आहेत. मी आजन्म शिवसेनेच राहील आणि शिवसैनिक म्हणनूच मरेल', असे ते माझ्याशी बोलले आहेत. यासंदर्भात मी उद्धव ठाकरे यांच्याशी बोललो आहे. तसेच सरनाईक यांच्याविषयी तु्म्हाला लवकरच बातमी कळेल," असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. हे देखील वाचा- OBC Political Reservation: महाराष्ट्र सरकारविरोधात खासदार रक्षा खडसे यांच्या नेतृत्वाखाली जळगावात आंदोलन

प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन पानांचे पत्र लिहून महाआघाडीत मित्रपक्षांवर टीका केली आहे. सरनाईक यांनी 10 जून रोजी हे पत्र लिहिले होते. ज्यात त्यांनी म्हटले होते की, "सत्तेत असलेले राष्ट्रवादी-काँग्रेस आपलेच कार्यकर्ते फोडत आहेत. या स्थितीत मला पुन्हा एकदा आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी जुळवून घेतलेले बरे, असे माझे वैयक्तिक मत आहे. निदान यामुळे प्रताप सरनाईक, अनिल परब, रवींद्र वायकर या आपल्या सहकाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना होणारा नाहक त्रास तरी थांबेल," अशी मागणी प्रताप सरनाईक यांनी केली आहे.