Sanjay Raut On Kangana Ranaut: कंगना रणौतने महाराष्ट्राची माफी मागितली तर मी विचार करील - संजय राऊत
Sanjay Raut | (Photo Credits: ANI)

Sanjay Raut On Kangana Ranaut: अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) च्या मुंबई संदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचे वातावरण ढवळून निघाले आहे. कंगनाने महाराष्ट्राची माफी मागावी, अशी मागणी शिवसेनेकडून होत आहे. अशातचं आता शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी 'कंगना रणौतने महाराष्ट्राची माफी मागितली, तर मी विचार करील,' असं म्हटलं आहे.

याशिवाय संजय राऊत यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून कंगनावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. यात राऊत यांनी म्हटलं आहे की, 'मेरी हिम्मत को परखने की गुस्ताखी न करना, पहले भी कई तूफानों का रुख मोड चुका हूँ.' (हेही वाचा -Sushant Singh Rajput Case: रिया चक्रवर्ती हिला NCB कडून समन्स; आज चौकशी होणार)

दरम्यान, आज प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी कंगना संदर्भातील आपली भूमिका स्पष्ट केली. कंगणा रणौतने महाराष्ट्र आणि मुंबईची माफी मागितली, तर मी विचार करेल. कंगना मुंबईला मिनी पाकिस्तान म्हणते. अहमदाबादला मिनी पाकिस्तान बोलण्याची तिची हिंमत आहे का? मुंबई आमची आई आहे. मुंबादेवी आमची आई आहे. मुंबईत खाऊन-पिऊन कमाई करून जर मुंबईबद्दल कोणी अपशब्द वापरत असेल तर आम्ही कसं ऐकून घेणार? कंगनाने मुंबई आणि मराठी माणसांची माफी मागितली पाहिजे, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.