जम्मू कश्मीर: राजौरी सेक्टर मधील गोळीबारात कोल्हापूरच्या संग्राम पाटील यांना वीरमरण

जम्मू कश्मीरच्या राजौरी मध्ये नौशारा सेक्टर (Nowshera sector) झालेल्या गोळीबारात हवालदार संग्राम पाटील गंभीर जखमी झाले आणि उपचारामध्ये त्यांचे निधन झाले.

जम्मू कश्मीर: राजौरी सेक्टर मधील गोळीबारात कोल्हापूरच्या संग्राम पाटील यांना वीरमरण
Havaldar Sangram Shivaji Patil | ANI/ Twitter

भारत-पाक सीमेवर मागील काही दिवसांपासून तणावाचे वातावरण आहे. पाकिस्तान कडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करून वारंवार गोळीबार केला जात असल्याच्या घटना समोर येत आहे. काल रात्री 1च्या सुमारासही गोळीबार झाला असून यामध्ये कोल्हापूरचे संग्राम पाटील (Havaldar Patil Sangram Shivaji) शहीद झाले आहेत. जम्मू कश्मीरच्या राजौरी मध्ये नौशारा   सेक्टर (Nowshera sector) झालेल्या गोळीबारात हवालदार संग्राम पाटील गंभीर जखमी झाले आणि उपचारामध्ये त्यांचे निधन झाले. दरम्यान एका आठवड्यात संग्राम पाटील हे कोल्हापुरचे दुसरे जवान आहेत ज्यांना पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या हल्ल्यात आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळे कोल्हापुरात पुन्हा शोककळा पसरली आहे. काही दिवसांपूर्वीच ऋषिकेश जोंधळे या 20 वर्षीय जवानाला वीरगती प्राप्त झाली होती. जम्मू कश्मीर: मराठा बटालियन मधील ऋषीकेश जोंधळे आणि भूषण सतई यांना वीर मरण.

संग्राम पाटील हे कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यामधील निगवे खालसा या गावचे रहिवासी होते. जम्मू-काश्मीरमधील राजौरी भागात सोळा मराठा पोस्टमध्ये ते काम करत होते. बेळगाव मध्ये 16 मराठा रेजिमेंटमध्ये संग्राम पाटील रूजु झाले होते. संग्राम पाटील यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. पुढील 6 महिन्यात संग्राम निवृत्त होणार होते.

ANI Tweet

दरम्यान पाककडून सुरू असलेल्या कारवायांचा भारताकडून निषेध व्यक्त करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी जम्मूच्या नगरोटा इथे टोल नाक्यावर झालेल्या चकमकीत 4 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. यावरून आज पाकिस्तानच्या हाय कमिशनला समन्सदेखील बजावण्यात आला आहे.

(The above story first appeared on LatestLY on Nov 21, 2020 01:09 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).