औरंगाबाद: पैठण तालुक्यात शेततळ्यात बुडून एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू
(Image Courtesy: Archived, Edited, Symbolic Image)

राज्यात कोरोनाने थैमान घातले असताना औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. पैठण तालुक्यातील (Paithan Taluka) एकाच कुटुंबातील 5 जणांचा शेततळ्यात (Farm Lake) बुडून मृत्यू झाला आहे. मृत 5 जण विहामांडवा येथे शेततळ्यात पोहण्यासाठी गेली होती. त्यावेळी ही धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे विहामांडवा परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मृतामध्ये बाप- लेक आणि दोन सख्खा भावाचा समावेश होता. लक्ष्मण निवृत्ती कोरडे (30 वर्षे), सार्थक लक्ष्मण कोरडे (5 वर्षे), अलंकार रामनाथ कोरडे (15 वर्षे), वैभव रामनाथ कोरडे (10), समर्थ ज्ञानदेव कोरडे (10 वर्षे) अशी या मृतांची नावे आहेत. (हेही वाचा - Maharashtra SSC Board Exam 2020: दहावीचा भूगोलाचा पेपर रद्द, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचा निर्णय)

प्राप्त माहितीनुसार, आज दुपारी कोरडे वस्तीवरील लक्ष्मण कोरडे हे मुलगा व पुतणे यांना पोहणे शिकविण्यासाठी वस्तीवरील शेततळ्यात घेऊन गेले होते. पोहताना बुडू नये म्हणून शेततळ्यात एक दोर सोडण्यात आला होता. लक्ष्मण कोरडे यांनी मुलांना पोहण्याच्या सुचना दिल्या. परंतु, काही वेळातचं शेततळ्यात बांधलेला दोर तुटला आणि चारही मुले पाण्यात बुडू लागली. त्यामुळे लक्ष्मण कोरडे यांनी मुलांना वाचवण्यासाठी शेततळ्यात उडी मारली. मात्र, दोर तुटल्यामुळे पाचही जण शेततळ्यात बुडू लागले. त्यानंतर काही वेळातचं त्यांना पाचोड येथील रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र तेथे या पाचही जणांना मृत घोषित करण्यात आले.