Domestic Flights: महाराष्ट्र सरकारकडून 25 मे पासून विमान उड्डाण सुरु करण्याच्या निर्णयाला अद्याप हिरवा कंदील नाही-रिपोर्ट्स
Representational Image (Photo credits: Pixabay, Lars_Nissen_Photoart)

कोरोना व्हायरसने थैमान घातल्याने लॉकडाउनचे आदेश येत्या 31 मे पर्यंत कायम राहणार असल्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. याच दरम्यान, विमानसेवा पुर्ववत करण्यासाठी कर्नाटक, केरळसह अन्य काही राज्यांनी सुरुवात केली आहे. परंतु विमान प्रवास करण्यासाठी प्रवाशांसाठी काही मार्गदर्शत सुचनांची नियमावली सुद्धा जाहीर केली आहे. केंद्र सरकारने 25 मे पासून विमान सेवा सुरु करण्याची परवानगी दिली आहे.  परंतु महाराष्ट्र सरकारने आंतरराज्यीत विमान उड्डणांबाबत कोणताही निर्णय घेतला नाही आहे.

राज्यात 31 मे पर्यंत लॉकडाउन कायम राहणार असल्याने राज्य सरकारने आंतरराज्यीत विमान उड्डाणाबाबत कोणताही निर्णय जाहीर केलेला नाही. सध्याच्या लॉकडाउनच्या काळात केंद्राकडून कोणताही समन्व साधला जात नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे एकूणच संभ्रमाची परिस्थिती निर्माण झाली आहे.(महाराष्ट्र सरकारचा टीव्ही उत्पादन आणि फिल्मिसिटी मध्ये शुटिंग सुरु करण्याचा विचार- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे)

मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून असे सांगण्यात आले आहे की, विमानतळावर सर्व प्रवाशांसाठी स्क्रिनिंगची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. तसेच प्रवाशांना 14 दिवस होम क्वारंटाइनचा सल्ला देण्यात येणार आहे.

शुक्रवार पर्यंत 2423 भारतीयांना विदेशातून आपल्या मायदेशी परत आणण्यात आले आहे. तर वंदे भारत मिशन अंतर्गत मुंबईत 17 आंतरराष्ट्रीय विमानांचे लँडिंग झाले. त्यापैकी 906 जण हे मुंबईतील असून 1139 जण हे राज्यातील अन्य ठिकाणचे आणि 378 हे दुसऱ्या राज्यातील असल्याचे सांगण्यात आले आहे. अजून 13 अधिक विमाने शुक्रवार ते 7 जून दरम्यान मुंबईत येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मुंबईत राहणाऱ्यांना विविध हॉटेल्स मध्ये क्वारंटाइन करण्यात आले आहे. राज्यातील नागरिकांना त्यांच्या जिल्ह्यात परत पाठवण्यात आले आहे. परंतु दुसऱ्या राज्यातील नागरिकांना मुंबईतच क्वारंटाइन करण्यात आले असून त्यांना पाठवण्यासंदर्भात परवानगी मिळाल्यानंतर पाठवण्यात येणार असल्याचे मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.