Currency Note Press (Photo Credits: ANI)

कोरोना व्हायरसचा (Coronavirus) प्रार्दुभाव रोखण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणा सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. या रोगाचा फैलाव अजून होऊ नये यासाठी महाराष्ट्रात (Maharashtra) 31 मार्चपर्यंत लॉकडाऊन ठेवण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व सुविधा बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यातच आता नाशिकमधील नोटा छापण्याचा कारखानाही 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्यात आला आहे. कामगार संघटना आणि महामंडळ मिळून हा निर्णय घेण्यात आला आहे अशी माहिती या संघटनेचे प्रमुख जगदिश गोडसे (Jagdish Godse) यांनी दिली आहे.

नाशिकमधील नोटा छपाई कारखान्यातील कामगार आणि कर्मचा-यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच 'आम्ही आमचे 99% काम 20 मार्चपर्यंत पूर्ण केले आहे', त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला असल्याचे जगदीश गोडसे यांनी सांगितले आहे. जनता कर्फ्यूला उदंड प्रतिसाद मिळाल्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून नागरिकांना सोशल डिस्टंसिंगचे आवाहन

कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी भारताचा आता अत्यंत कठीण काळ सुरू झाला आहे. यामध्ये कोरोना व्हायरस झपाट्याने वाढू शकतो. या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्रात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. पूर्वी केवळ मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड या भागात लागू असलेले कलम 144 आता राज्यभर लागू करण्यात आल्या आहेत. मुंबई शहरामध्ये आज मध्यरात्रीपासून मुंबई लोकल बंद करण्यात आली आहे. मात्र अत्यावश्यक सेवा देणार्‍यांना आता बससेवेचा फायदा घेता येणार आहे.

अत्यावश्यक सेवामध्ये भाजीपाला, किराणा माल दुकानं, मेडिकल स्टोअर्स, आर्थिक व्यवहारांसाठी बॅंक आणि शेअर बाजार खुला राहणार आहेत. मात्र इतर खाजगी कंपन्यांनी वर्क फ्रॉम होम करण्याचा सल्ला देताना सरकारी कर्मचार्‍यांनी केवळ 5% उपस्थितीमध्ये कार्यालयं सुरू ठेवण्याचा आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.