महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसागणिक दुप्पटीने वाढत आहे. त्यामुळे राज्य सरकार कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. त्याचसोबत येत्या 31 मे पर्यंत लॉकडाऊन कायम राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. सध्या चौथ्या टप्प्य्तील लॉकडाऊन संपण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक आहेत. तत्पूर्वी राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आल्यापासून ते आतापर्यंत आयपीसीच्या कलम 188 अंतर्गत तब्बल 1,18,647 गुन्हांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये 23,506 जणांना अटक करण्यात आल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.
राज्यात नागरिकांनी कोरोनाच्या परिस्थितीत अनावश्यक कारणांसाठी घराबाहेर पडू नये असे आवाहन करण्यात आले आहे. तरीही काही नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच नियमांची पायपल्ली करणाऱ्यांकडून आतापर्यंत एकूण 5,79,85,371 इतका दंड वसूल करण्यात आला आहे. त्याचसोबत 254 पोलिसांवर हल्लाच्या घटनांमध्ये 833 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. बेकायदा वाहतुकीसाठी 1323 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.(महाराष्ट्र पोलिस खात्यामध्ये एकूण 2211 पोलिस कर्मचारी COVID 19 च्या विळख्यात; 24 तासांत 116 जणांना कोरोनाची बाधा)
लॉकडाउन लागू झाल्यापासून आयपीसीच्या कलम १८८ अंतर्गत तब्बल १,१८,६४७ गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. यांत २३,५०८ जण अटक झालेत व ७६,०७६ वाहने जप्त झाली आहेत.
₹५,७९,८५,३७१ इतका दंड
गुन्हेगारांकडून वसूल केला गेला आहे.
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) May 29, 2020
दरम्यान, महाराष्ट्रातील वैद्यकिय कर्मचारी आणि डॉक्टर्स, नर्स यांच्याकडून कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. तसेच पोलीस दलातील कर्मचारी सुद्ध अहोरात्र आपले कर्तव्य बजावताना दिसून येत आहेत. पोलीस दलातील आतापर्यंत 2211 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असून 970 जणांची प्रकृती सुधारली आहे. परंतु 25 पोलिसांची कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.