Aryan Khan Drugs Case: 'तर मी मंत्रिपद सोडेन', आर्यन खान ड्रग्ज केस प्रकरणात नवाब मलीक यांचे समीर वानखेडे कुटुंबीयांना खुले आव्हान
Nawab Malik | (Photo Credits: Facebook)

एनसीबी (NCB) आणि महाविकासआघाडी सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांच्यातील संघर्ष आता अधिकच वाढला आहे. आता तर नवाब मलिक (Nawab Malik) यांनी थेट भूमिका घेत जाहीर आव्हानच दिले आहे. नवाब मलिक यांनी म्हटले आहे की, एनसीबीचे संचालक समीर वानखेडे ( Sameer Wankhede) यांच्या विरोधात आपण केलेले आरोप जर खोटे असतील तर आपण मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला तयार आहे. नवाब मलिक यांच्या आव्हानावर आता समिन वानखेडे काय प्रत्युत्तर देतात याबाबत उत्सुकता आहे.

समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर यांनी पत्रकार परिषद घेऊन नवाब मलिक यांचे आरोप खोडून काढण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, आता नवाब मलिक यांनी वानखेडे कुटुंबीयांनाच आव्हान देत 'वानखेडेंचा जन्माचा दाखला खोटा निघाल्यास मंत्रिपद सोडेन' असे म्हटले आहे. समीर वानखेडे यांनी फसवणुकीच्या मार्गाने IRS मध्ये महत्त्वाच्या पदाची नोकरी मिळवली. मी ज्या मुद्द्यावर बोलत आहे तो धर्माशी संबंधीत नाही. त्यांनी ज्या फसवणुकीच्या मार्गाने आयआरएसची नोकरी मिळवली आणि एका पात्र असणाऱ्या अनुसूचित जातीच्या व्यक्तीला त्याच्या अधिकार, हक्क आणि भविष्यापासून वंचित ठेवले ते मला जनतेसमोर आणायचे आहे, असे ट्विट मलिक यांनी केले आहे. (हेही वाचा, Nawab Malik Vs Sameer Wankhede: नवाब मलिकांना NCB Officer चं निनावी पत्र,खोट्या केस तयार केल्या जात असल्याचा दावा; समीर वानखेडे यांच्या चौकशीची मागणी)

ट्विट

ट्विट

दरम्यान, ड्रग्ज प्रकणात आतापर्यंत पाठिमागील वर्षभरातून झालेल्या कारवाईबाबतही नवाब मलिक यांनी स्पष्ट मत व्यक्त केले आहे. ड्रग्ज प्रकरणात जवळपास एक वर्षापासून एफआयआर दाखल करण्यात आला आहे. ज्याच्या आधारे दीपिका पदुकोण, सारा अली खान आणि श्रद्धा कपूर यांना बोलावण्यात आले होते, परंतु यापैकी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. त्यामुळे सत्य शोधण्यासाठी. आपण याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे आणि मालदीवच्या दौऱ्यावर देखील, असे महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक यांनी म्हटले आहे. मालदिवमध्ये समीवर वानखेडे किंवा त्यांच्याशी संबंधितांना कोणकोणते अभिनेते अभिनेत्री भेटले यांची माहिती पुढे यायला हवी, असेही मलिक म्हणाले.