Rahul Gandhi on Budget 2022: अर्थसंकल्पावर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया, जाणून घ्या काय म्हणाले काँग्रेस नेते?
Rahul Gandhi | ( Photo Credits: Twitter/ ANI)

Rahul Gandhi on Budget 2022: अर्थमंत्र्यांनी सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पावर (Union Budget 2022) काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. राहुल गांधी यांनी या अर्थसंकल्पाला शून्य असं म्हटलं आहे. यासोबतचं पगारदार वर्ग, मध्यमवर्गीय, गरीब, शेतकरी, तरुण आणि छोटे व्यापारी यांच्यासाठी सर्वसाधारण अर्थसंकल्पात काहीही नसल्याचे राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

राहुल गांधी यांनी ट्विट करून म्हटलं आहे की, 'मोदी सरकारच्या बजेटमध्ये काहीच नाही. मध्यमवर्गीय, पगारदार वर्ग, गरीब आणि वंचित वर्ग, तरुण, शेतकरी आणि एमएसएमईसाठी काहीही नाही.' त्याचवेळी, काँग्रेसने 2022-23 या आर्थिक वर्षाच्या केंद्रीय अर्थसंकल्पावर निराशा व्यक्त करत, हा श्रीमंतांचा अर्थसंकल्प असल्याचे म्हटलं आहे. तसेच सरकारने देशातील पगारदार वर्ग आणि मध्यमवर्गीयांना दिलासा न देता विश्वासघात केल्याचा आरोप केला आहे. (वाचा - Union Budget 2022: अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर कपडे, बूटांसह 'या' वस्तू झाल्या स्वस्त, जाणून घ्या कोणत्या वस्तूंचे वाढले दर)

निर्मला सीतारामन यांनी आज देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला. त्याला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, या अर्थसंकल्पाने 100 वर्षांच्या भीषण आपत्तीच्या काळात विकासाचा नवा विश्वास दिला आहे. या अर्थसंकल्पामुळे अर्थव्यवस्था मजबूत करण्यासोबतचं सर्वसामान्यांसाठी अनेक नव्या संधी निर्माण होणार आहेत. ते म्हणाले की, हा अर्थसंकल्प अधिक पायाभूत सुविधा, अधिक गुंतवणूक, अधिक विकास आणि अधिक नोकऱ्यांच्या नवीन शक्यतांनी परिपूर्ण आहे. हा अर्थसंकल्प सध्याच्या समस्या सोडवणारा आणि आपल्या तरुणांसाठी भक्कम भविष्याची हमी देणारा आहे, असंही मोदी यांनी म्हटलं आहे.