मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतली ममता दीदींची भेट, EVM मशीन विरोधी मोर्चा साठी मुंबईत येण्याची केली विनंती

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत वापरण्यात आलेल्या ईव्हीएम मशिन्स मध्ये गडबड असल्याचे म्हणत मागील काही दिवसांपासून विरोधीपक्षाच्या नेत्यांची भेट घेण्याचे सत्र सुरु केले आहे. आज, 31जुलै ला त्यांनी कोलकाता येथे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री व तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांची मुख्यमंत्री कार्यालयात भेट घेतली. तसेच त्यांना ईव्हीएम विरोधी मोर्च्यात सामील होण्याची विनंती सुद्धा केली आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतली ममता दीदींची भेट, EVM मशीन विरोधी मोर्चा साठी मुंबईत येण्याची केली विनंती
Raj Thackrey And Mamta Banarjee (Photo Credits: PTI)

लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha 2019)  आधी, दरम्यान आणि आता निकाल लागून दोन महिने उलटून गेल्यावरही मनसे  (MNS)अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackrey) यांचे सरकारवर नाराजी मात्र कायम आहे.  निवडणुकीत वापरण्यात आलेल्या ईव्हीएम मशिन्स (EVM Machines) मध्ये गडबड असल्याचे म्हणत मागील काही दिवसांपासून त्यांनी विरोधीपक्षाच्या नेत्यांची भेट घेण्याचे सत्र सुरु केले आहे. यातच आज, 31 जुलै ला त्यांनी कोलकाता (Kolkata)  येथे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री (West Bengal CM) व तृणमूल काँग्रेसच्या (Trinmool Congress) ममता बॅनर्जी (Mamta Banarjee) यांची मुख्यमंत्री कार्यालयात भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये ईव्हीएम व अन्य मुद्द्यांवर सुमारे पाऊण तास विस्तृत चर्चा झाल्याचे समजत आहे. या बैठकी दरम्यान राज यांनी ममता दीदी यांना मुंबईत येऊन ईव्हीएम विरोधी मोर्च्यात सहभाग घेण्याची विनंती केली आहे. तर दुसरीकडे, राज यांची विनंतीला स्वीकारत ममता यांनी सुद्धा आपण व तृणमूल काँग्रेस पक्ष पूर्णतः या लढ्यात सहकार्य करू असे आश्वासन दिले आहे.

राज-ममता यांच्यात झालेल्या चर्चासत्रानंतर त्यांनी माध्यमाशी संवाद साधला, यावेळेस त्यांनी पूर्वीपासूनच आपला ईव्हीएमला विरोध असून त्यासाठी आम्ही कोर्टात धाव घेतल्याचे नमूद केले.यापूर्वीही 8 जुलैला केंद्रीय निवडणूक आयोगाची भेट घेऊन याबाबत तक्रार केली होती तसेच महाराष्ट्रात ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुका मतपत्रिकेद्वारे घ्याव्यात, अशी मागणी सुद्धा केली होती. पण आता,राज यांनी आपला सूर बदलून आपला निवडणूक आयोग, सुप्रीम कोर्ट, हाय कोर्ट या सगळ्यांवरचा विश्वास उडाला असल्याचे सांगत या बाबतीत सर्व पक्षांनी एकत्र येऊन कारवाई विरोध करण्याची गरज असल्याचे म्हंटले आहे. राजू शेट्टी आणि राज ठाकरे यांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळातील समीकरण बदलणार?

ANI ट्विट

दरम्यान, राज यांनी ईव्हीएम च्या मुद्द्यावरून यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांचीही भेट घेतली होती व त्यांच्याशी ईव्हीएमसह विविध विषयांवर चर्चा केली होती. त्यानंतर आता राज यांनी ममता यांची भेट घेऊन ईव्हीएमविरोधी आवाज अधिक बळकट करण्याचा विचार पक्का केला आहे. यामध्ये त्यांना किती यश मिळते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

(The above story first appeared on LatestLY on Jul 31, 2019 07:10 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).