Water From Air: 'हवेतून पाणी'; राहुल गांधी यांनी सांगितला देशासमोरील सर्वात मोठा धोका, म्हणाले 'पंतप्रधान मोदी यांना 'हे' सांगण्याची हिंमत त्यांच्या समर्थकांमध्ये नाही'
PM Narendra Modi, Rahul Gandhi | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

राफेल (Dassault Rafale) व्यवाहार असो, चीनची घुसखोरी असो की शेती विधेयक कायदा 2020 (Agriculture Bills 2020). काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) हे सुरुवातीपासूनच पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर निशाणा साधताना दिसले आहेत. राहुल गांधी यांनी आज पुन्हा एकदा पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. आपल्या ट्विटर हँडलवरुन राहुल गांधी यांनी एक व्हिडिओ शेअर करत मोदीवंर जोरदार निशाणा साधला आहे. या व्हिडिओत पंतप्रधान मोदी एका बड्या कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याशी बोलताना दिसत आहेत. ज्यात 'हवेतून पाणी' (Water From Air) काढण्याबाबत मोदी बोलत आहेत. दरम्यान, राहुल गांधी यांच्या टिकनंतर केंद्रीय मंत्री पीयूष गोयल  (Piyush Goyal) आणि स्मृती इरानी पंतप्रधानांचा बचाव करण्यासाठी पुढे आल्या आहेत.

राहुल गांधी यांनी व्हिडिओ शेअर करत म्हटले आहे की, भारतासमोर सर्वात मोठा धोका हा नाही की पंतप्रधानांना काही समज नाही. खरा धोका हा आहे की, ही गोष्ट पंतप्रधानांना सांगण्याची हिंमत त्यांच्या आजूबाजूच्या कोणातच नाही. (हेही वाचा, Agriculture Laws 2020: राहुल गांधी यांचा मोदी सरकारवर निशाणा म्हणाले 'भारतातील लोकशाही मेली आहे, हा घ्या पुरावा')

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पवन उर्जा आणि भविष्यातील शक्यता या विषयावर एका कंपनीच्या सीईओसोबत चर्चा केली. या व्हिडिओत पंतप्रधान मोदी यांनी विचारले की, पवन उर्जेच्या टर्बाईनच्या माध्यमातून आर्द्रता अधिक असलेल्या ठिकाणाहून हवेतील पाणी शोशून घेऊन गाव खेड्यांतील पाण्याची समस्या आपण सोडवू शकतो काय? ही माझी सूचना आहे. आपण वैज्ञानिक या दिशेने काम करु शकता.

राहुल गांधी यांच्या या टीकेनंतर पंतप्रधान मोदी यांचा बचाव करण्यासाठी केंद्रीय मंत्री पुढे सरसावले आहेत. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी म्हटले आहे की, राहुल गांधी यांना समजत नाही हे सांगण्याचे धाडस त्यांच्याच आजूबाजूच्या लोकांमध्ये नाही. पंतप्रधान मोदी हे ज्या कंपनीच्या अधिकाऱ्याशी बोलत आहेत. त्या अधिकाऱ्यानेही पंतप्रधान मोदी यांच्या विचारांचे समर्थन केले आहे. असे असताना राहुल गांधी मात्र पंतप्रदानांची खिल्ली उडवत आहेत.

स्मृती इरानी यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका करत म्हटले आहे की, काँग्रेससमोर खरा धोका वाढत आहे. काँग्रेसमधील कोणामध्येच युवराजांविरुद्ध बोलण्याची हिंम्मत नाही. भाजप आयटी सेल प्रमुख अमित मालवीय यांनी काही बातम्यांच्या लिंक शेअर करत टरबाईनच्या माध्यमातून हवेतून पाणी काडण्याच्या सूचनेचे समर्थन केले आहे.