Farmers Protest: शेतक-यांच्या मागण्यांसंदर्भात येत्या 9 डिसेंबरला शरद पवार घेणार राष्ट्रपतींची भेट
Sharad Pawar And Ramnath Kovind (Photo Credits: PTI)

नवी दिल्लीत (Navi Delhi) मागील काही दिवसांपासून शेतक-यांच्या सुरु असलेल्या आंदोलनाने आता उग्र रुप धारण केलेले चित्र पाहायला मिळत आहे. कृषी कायद्याविरोधात हे आंदोलन करण्यात आले असून सर्व शेतकरी संघटना प्रचंड आक्रमक होऊन रस्त्यावर उतरले आहेत. या संदर्भात काल केंद्र सरकारसोबत शेतकरी संघटनांच्या मुख्य लोकांशी बैठक देखील झाली. मात्र पाचव्या बैठकीतही तोडगा निघालेला नाही. यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ramnath Kovind) यांची भेट घेणार आहे. येत्या 9 डिसेंबरला शरद पवार रामनाथ कोविंद यांना भेटणार आहेत.

दरम्यान शेतक-यांनी येत्या 8 डिसेंबरला एल्गार पुकारत भारत बंदची हाक दिली आहे. केंद्र सरकारने आणलेल्या 3 कृषी कायद्यांविरोधात शेतक-यांनी हा एल्गार पुकारला आहे. हा कायदे रद्द करुन हमीभावाची मागणी देखील शेतक-यांनी सरकारकडे केली आहे. आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात शरद पवारांसह विरोधी पक्षातील नेते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहेत.हेदेखील वाचा- Agriculture Reform Laws: कृषी कायद्याबाबत शहाणपणाची भूमिका घ्या, शरद पवार यांचा केंद्र सरकारला सल्ला

"आपण संपूर्ण देशाची शेती आणि अन्न पुरवठा बघितला, तर सगळ्यात जास्त योगदान त्यात पंजाब व हरयाणातील शेतकऱ्यांचं आहे. विशेषतः गहू आणि तांदूळ यांच्या उत्पादनात देशाची गरज या शेतकऱ्यांनी भागवली. पण त्याचबरोबर जगातील 17-18 देशांना धान्य पुरवण्याचं काम भारत करतो. त्यात पंजाब आणि हरयाणाचा वाटा फार मोठा आहे. ज्यावेळी पंजाब व हरयाणातील शेतकरी रस्त्यावर येतो, त्याची फार गांभीर्यानं दखल घ्यायला पाहिजे होती. पण, दुर्दैवानं ती घेतलेली दिसत नाही." असं शरद पवार म्हणाले.

देशाच्या कानाकोपऱ्यातील लोक या शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे राहतील आणि प्रश्नांची सोडवणूक आपल्या पद्धतीने करून घेतली. अजूनही शहाणपणाची भूमिका घ्यावी, अशीच माझी अपेक्षा आहे,”असा सल्ला पवारांनी मोदी सरकारला दिला आहे.

देशवासियांचा अन्नदाता असलेल्या शेतक-याला योग्य तो न्याय मिळावा यासाठी शरद पवार येत्या 9 डिसेंबरला संध्याकाळी 5 वाजता रामनाथ कोविंद यांना भेटणार आहेत.