Coronavirus Lockdown मुळे घराकडे पायपीट करत जाणाऱ्या कुटुंबाना अन्नपाणी पुरवण्यासह मदत करण्याचे राहुल गांधी यांचे आवाहन
Rahul Gandhi appeal to help migrant workers (Photo Credits-Twitter/Facebook)

कोरोना व्हायरसचा (Coronavirus) भारत देशातील वाढता संसर्ग पाहता खबरदारी म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी 21 दिवस लॉकडाऊनची (Lockdown) घोषणा केली. त्यामुळे सर्व कारखाने, व्यवसाय, उद्योगधंदे ठप्प झाले आहेत. त्यामुळे रोजंदारी कामगार, मजूर यांचे प्रचंड हाल होत आहेत. मुलभूत गरजांची भ्रांत त्यांना आहे. देशातील विविध भागातून दिल्ली सारख्या शहरांमध्ये कामानिमित्त आलेले कामगार आता बेरोजगार झाले आहेत. त्यामुळे त्यांच्यापुढे अन्न, पाण्यासह निवाऱ्याचाही प्रश्न उभा राहिला आहे. त्यातच लॉकडाऊनमुळे रेल्वे, बससेवा सारं काही बंद असल्याने आपले गाव गाठण्यासाठी त्यांनी  पायी चालत जाण्याचा पर्याय निवडला आहे. मात्र या कठीण प्रवास करणाऱ्या कुटुंबांना मदत करण्याचे आवाहन राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी देशवासियांना केले आहे. Coronavirus Lockdown मुळे बेरोजगार कामगारांची घराच्या दिशेने धाव; घर गाठण्यासाठी कुटुंबासह पायपीट (Watch Video)

राहुल गांधी यांनी ट्विट करत लिहिले की, "आज आपल्या रस्त्यांवर आपलेच बंधू-भगिनी कुटुंबासह आपल्या गावाकडे चालत निघाले आहेत. या कठीण काळात तुमच्यापैकी जो कोणी त्यांना अन्न, पाणी, निवारा देऊ शकेल, मदत करु शकेल, अशा लोकांनी कृपया ती करावी." तसंच त्यांनी काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांनाही मदत करण्याचे आवाहन केले आहे.

राहुल गांधी यांचे ट्विट:

भारतात एकूण 873 कोरोनाग्रस्त रुग्ण आहेत. त्यापैकी उपचारानंतर 79 रुग्ण बरे झाले आहेत तर 20 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे वाढता धोका पाहता लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र लॉकडाऊनच्या काळात मजूर, कामगार यांचे प्रचंड हाल होणार याची जाणीव करुन देत या संकाटाचा सामना सरकारने दया भावाने करणे आवश्यक असल्याचेही राहुल गांधींनी म्हटले होते.