पीएम नरेंद्र मोदी यांचे 10 कोटी कुटुंबांना पत्र; व्हर्च्युअल रॅलींचे आयोजन करून 'BJP' साजरी करणार Narendra Modi Government 2.0 ची वर्षपूर्ती
Narendra Modi(photo Credits: ANI)

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वात सध्या केंद्र सरकारच्या दुसर्‍या कार्यकाळातील पहिले वर्ष, 30 मे 2020 रोजी पूर्ण होणार आहे. भारतीय जनता पक्षाने (BJP) नरेंद्र मोदी सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने, प्रत्येक जिल्ह्यात एक व्हर्चुअल मेळावा घेण्याचे ठरविले आहे. या दिवसाचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जनतेला उद्देशून एक पत्र लिहिले आहे. त्याद्वारे ही पार्टी 10 कोटी कुटुंबांपर्यंत पोहोचणार आहे. या पत्रामध्ये देशाला स्वावलंबी करण्याच्या सरकारच्या धोरणात्मक निर्णयाची आणि कोरोना व्हायरसचा प्रसार टाळण्यासाठी आवश्यक असलेल्या सावधगिरीची माहिती देण्यात आली आहे. पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस भूपेंद्र यादव यांनी ही माहिती दिली.

पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा (Jagat Prakash Nadda) हे फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून, देश-विदेशातील भाजपा कार्यकर्त्यांना संबोधित करतील अशी माहितीही यादव यांनी दिली. यादव पुढे म्हणाले की, 'मंत्रिमंडळाच्या वर्षपूर्तीनिमित्त पक्षाने निर्णय घेतला आहे की पंतप्रधानांनी त्यांच्या पत्राद्वारे आत्मनिर्भर भारत, कोविड-19 ची परिस्थिती व या संसर्गाविरूद्ध लढा आणि लोकल फॉर व्होकल यांसारखे मुद्दे 10 कोटी कुटुंबांपर्यंत पोहोचवले जातील.' हे पत्र प्रत्येक बूथवर दोन कामगार वाटप करणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. हे पत्र वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

प्रत्येक जिल्ह्यात एक व्हर्चुअल रॅली होईल ज्यामध्ये, स्वावलंबन, कोविड-19 ची स्थिती आणि त्याविरुद्ध लढा देण्याच्या उपाययोजना, सामाजिक जनजागृती या विषयांवर चर्चा केली जाईल,’ असे एका वरिष्ठ नेत्याने सांगितले. प्रत्येक मोठ्या प्रदेशात किमान 2 रॅली आणि लहान प्रदेशात किमान 1 रॅली, अशा 750 रॅलींचे आयोजन करण्याची योजना आहे. (हेही वाचा: मोदी सरकार-2 च्या वर्षपूर्तीसाठी 'BJP'चा मेगा प्लॅन; 1000 प्रेस कॉन्फरन्स, 750 व्हर्च्युअल रॅलींचे आयोजन)

दरम्यान, सद्य परिस्थिती लक्षात घेऊन समाजातील सर्व घटक आणि सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी, सर्व कार्यकर्त्यांनी व पक्षाच्या सर्व घटकांनी डिजिटल तंत्रज्ञान व आभासी माध्यम अवलंबले पाहिजे. सामाजिक अंतराचे अनुसरण करून, मास्कचा वापर करून आणि आरोग्याशी संबंधित इतर काळजी घेऊन सर्व कार्यक्रमांचे आयोजन करावे, असेही या निवेदनात सांगितले आहे.