Pakistan Fires Fatah-II Missile (फोटो सौजन्य - ANI)

Pakistan Fires Fatah-II Missile: भारत आणि पाकिस्तानमधील सुरू असलेला तणाव आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. दोन्ही देशांच्या सीमेवर युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. शनिवारी सकाळी पाकिस्तानने 'फतेह-2' क्षेपणास्त्राने (Fatah-II Missile) भारताची राजधानी दिल्लीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, परंतु भारतीय हवाई दलाच्या सतर्कतेमुळे हा कट अयशस्वी झाला. हरियाणाच्या सिरसा भागात हवेतच हे क्षेपणास्त्र रोखण्यात आले आणि नष्ट करण्यात आले, त्यामुळे दिल्लीवरील मोठा हल्ला टळला.

पाकिस्तानचा डाव फसला -

सरकारी सूत्रांनुसार, पाकिस्तानने 'ऑपरेशन बनायन उल मरसूस' अंतर्गत भारतातील अनेक भागांना लक्ष्य करण्याची योजना आखली होती. या कारवाईअंतर्गत, पाकिस्तानने जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे फतेह-2 क्षेपणास्त्र डागले, ज्याची रेंज सुमारे 120 किलोमीटर असल्याचे सांगितले जाते. हे क्षेपणास्त्र दिल्लीच्या दिशेने जात होते, परंतु भारतीय रडारने ते वेळीच शोधून काढले. भारतीय संरक्षण यंत्रणेने सिरसा एअरबेसवरून ताबडतोब प्रत्युत्तर दिले आणि हवेतच क्षेपणास्त्र नष्ट केले. (हेही वाचा - India-Pakistan Tension: 'भारताच्या लष्करी ठिकाणांवर हल्ला करण्यासाठी पाकिस्तानकडून ड्रोन, लांब पल्ल्याच्या शस्त्रे, दारूगोळा आणि लढाऊ विमानांचा वापर'; Colonel Sofiya Qureshi यांची माहिती (Video))

पाकिस्तानने डागले फतह-2 क्षेपणास्त्र - 

दिल्लीपासून सुमारे 200 किलोमीटर अंतरावर असलेल्या सिरसाजवळ ही कारवाई करण्यात आली. गृह मंत्रालयानेही या हल्ल्याची पुष्टी केली आहे आणि म्हटले आहे की दिल्ली पूर्णपणे सुरक्षित आहे आणि लोकांना घाबरण्याची गरज नाही.

पाकिस्तानी हवाई तळ उद्धवस्त -

भारताने पाकिस्तानच्या तीन प्रमुख हवाई तळांना लक्ष्य करून या हल्ल्याला योग्य उत्तर दिले आहे. श्रीनगर एअरबेसवरून भारताने डागलेल्या क्षेपणास्त्रांमुळे पाकिस्तानच्या लष्करी क्षमतेचे मोठे नुकसान झाले आहे. तीन पाकिस्तानी एअरबेस - नूर खान एअरबेस (चकाला, रावळपिंडी), पीएएफ रफीकी एअरबेस (शोरकोट, पंजाब) आणि पीएएफ मुरीद एअरबेस (चकवाल, पंजाब) - चे प्रचंड नुकसान झाले आहे. पाकिस्तानी लष्कराने स्वतः या हल्ल्यांना दुजोरा दिला आहे. याशिवाय, भारताने भारतीय सीमेत घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणारे एक पाकिस्तानी लढाऊ विमानही पाडले आहे.