All Party Meet On Ladakh Face-Off: लडाखमध्ये आपल्या देशाच्या सीमारेषेचं उल्लंघन करुन कुणीही घुसखोरी केलेली नाही- पंतप्रधान नरेंद्र मोदी
All Party Meeting (Photo Credits: ANI)

भारत-चीन मुद्द्यावरून (India-China Issue) आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीत "भारताचे जवान एखाद्या पर्वताप्रमाणे देशाच्या सीमांचं रक्षण करत आहेत. लडाखमध्ये आपल्या देशाच्या सीमारेषेचं उल्लंघन करुन कुणीही घुसखोरी केलेली नाही" असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. या बैठकीनंतर पंतप्रधानांनी जनतेशी संवाद साधला. ज्यात "लडाख मध्ये जे 20 जवान शहीद झाले त्यांनी भारतमातेकडे डोळे वर करून पाहणा-यांना चांगला धडा शिकवून गेले" असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

आपले लष्कर, जवान हे देशाची रक्षण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. राष्ट्रहित हेच आपल्या सगळ्याचं लक्ष आहे असंही मोदींनी म्हटलं आहे. India-China Clash: भारत 'मजबूत' आहे 'मजबूर' नाही, ‘आँखे निकालकर हात मे देना’; सर्वपक्षीय बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भूमिका

सर्वपक्षीय बैठक संपल्यानंतर त्यांनी देशाशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. पुढच्या रणनीतीसाठी सगळ्या पक्षांनी दिलेल्या सूचना या माझ्यासाठी महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे आपल्या देशाच्या जनतेचं धैर्य वाढलं आहे. तसंच सैनिकांचं मनोबल वाढण्यासही या बैठकीने भूमिका पार पाडली आहे असंही मोदींनी म्हटलं आहे.

या सर्वपक्षीय दलाच्या बैठकीत अधिकतर पक्षांनी पंतप्रधान मोदींवर विश्वास दाखवत चीन विरोधात सरकार जे पाऊल उचलेल त्यात आम्ही त्यांच्या सोबत असू असे सांगितले. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी असेही म्हणाले की, तैनात असो, अॅक्शन असो वा काउंटर अॅक्शन असो, सर्वत्र देशाच्या रक्षणासाठी आपल्या सैन्याला जे जे करायचे आहे ते ते सर्व ते करत आहेत.