अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षास नरेंद्र मोदी मंत्रिमंडळात स्थान नाही; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून बाजू सावरण्याचा प्रयत्न
भाजपचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी आज तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेत आहेत. त्यांच्या मंत्रिमंडळात कुणाकुणाला संधी मिळते याबाबत उत्सुकता आहे. पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला केंद्रीय मंत्रिमंडळात एकही जागा मिळणार नसल्याचं आता स्पष्ट झालं आहे.
राष्ट्रवादील (NCP) मंत्रिपद मिळणार नसल्याची सध्या चर्चा सुरू आहे. यासंदर्भात सुनील तटकरेंच्या (Sunil Tatkare) निवासस्थानी बैठक झाली. फडणवीस देखील या बैठकीला गेले होते. राष्ट्रवादीच्या नेत्यांची फडणवीसांकडून समजूत काढण्याचे प्रयत्न झाल्याची चर्चा आहे. भाजपचे महाराष्ट्रातील प्रमुख नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत मोठा खुलासा केला आहे. मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत किंवा मंत्रिमंडळात कुणाला स्थान द्यावं यासाठी राष्ट्रवादीच्याबाबत पडद्यामागे काय-काय घडलं? याचं सविस्तर विश्लेषणच देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. (हेही वाचा - PM Modi Oath Ceremony: नरेंद्र मोदींच्या शपथविधीला मल्लिकार्जुन खरगे उपस्थित राहणार)
“राष्ट्रवादी काँग्रेसला आमच्यावतीने तथा सरकारच्या वतीने एक जागा ऑफर करण्यात आली होती. राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार अशाप्रकारची जागा त्यांना देण्यात आली होती. पण त्यांचा आग्रह असा होता की, आमच्याकडून खासदार प्रफुल्ल पटेल यांचं नाव फायनल आहे. ते आधी मंत्री राहिलेले आहेत. त्यामुळे आम्हाला त्यांना आम्हाला राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार हे करता येणार नाही. मात्र, आपल्यालादेखील कल्पना आहे की, जेव्हा युतीचं सरकार असतं तेव्हा त्यावेळी काही निकष तयार करायचे असतात. कारण अनेक पक्ष तेव्हा सोबत असतात. त्यामुळे एका पक्षाकरता तो निकष मोडता येत नाही”, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
“राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एक जागा मंत्रिमंडळात देण्यात आली होती. राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार ही जागा त्यांना देण्यात आली होती. त्यांचा आग्रह कॅबिनेट मंत्र्याचा होता. राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार हा कॅबिनेट मंत्र्याप्रमाणेच असतो. पण त्यांचीदेखील अडचण होती की, कॅबिनेट मंत्रीपदावर राहिलेला माणूस त्यांना राज्यमंत्री स्वतंत्र प्रभारावार आणता येत नव्हता. सरकारचा प्रश्न होता की, युतीत वेगवेगळ्या पक्षांसाठी साधारणपणे एक निकष ठेवावा लागतो. त्यामुळे राष्ट्रवादीने देखील ते मान्य केलं आहे. त्यांनी सांगितलं की, तुम्ही विस्ताराच्यावेळेला आमचा विचार करा. विस्ताराच्यावेळेला अनेकांचा विचार होईल”, अशी भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी मांडली.
(The above story first appeared on LatestLY on Jun 09, 2024 04:11 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

