India- Pakistan बॉर्डर पार करुन गर्लफ्रेंडला भेटायला निघाला होता उस्मानाबाद चा 20 वर्षीय तरुण; पुढे काय घडलं वाचा सविस्तर
Zishan Siddiqui (Photo Credits: Twitter)

सीमा सुरक्षा दलाच्या (BSF) जवानांनी गुरुवारी भारत- पाकिस्तान बॉर्डर (IND-PAK Border) वर एका महाराष्ट्रीय तरुणाला अटक केली आहे. महाराष्ट्रातील उस्मानाबाद (Osmanabad) चा रहिवाशी 20 वर्षीय सिद्दीकी मोहम्मद झिशान पाकिस्तानातील (Pakistan) आपल्या गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी चक्क बॉर्डर ओलांडून जाण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळीच बीएसएफने भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेपासून 1.5 कि.मी. अंतरावर त्याला पकडले आणि चौकशी केली. या दरम्यान घाबरून झिशान ने कच्छ च्या रणमधून पाकिस्तानकडे जाण्याचा प्रयत्न करत असल्याची कबुली दिली. पाकिस्तानच्या कराची (Karachi) मधील शाह फैसल शहरातील राहणा सम्रा नावाच्या मुलीवर त्याचे प्रेम आहे, सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या दोघांची ओळख झाली आणि आता तिला भेटण्यासाठी पाकिस्तानला जाण्याचा प्लॅन या पठ्ठ्याने आखला होता. यासाठी तो गूगल नॅव्हिगेशनचा (Google Navigation) वापर करत होता. Kulbhushan Jadhav Case: कुलभूषण जाधव प्रकरणात तिसरा Consular Access देण्यासाठी पाकिस्तानकडून भारताला ऑफर

प्राप्त माहितीनुसार, झीशानच्या आई-वडिलांनी आपला मुलगा हरवल्याची तक्रार नोंदवली होती. त्याच्या मोबाईलला ट्रॅक करताना त्याचे सिग्नल्स गुजरात मध्ये आढळून आले. महाराष्ट्र पोलीस गुन्हा शाखेने याबाबत गुजरात पोलिसांकडे तपशील दिला होता. गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील बालासर पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी ही माहिती बीएसएफ सैन्याला सुद्धा दिली होती, यानुसार तपास सुरु असताना मुलाच्या मोबाइल ट्रॅकिंग सिस्टममुळे बीएसएफ जवानांना ढोईविरा येथे सिग्नल दिसला. काही वेळ तपास करताच फॉसील पार्कजवळ महाराष्ट्र कोड नंबर असलेली काळ्या रंगाची बजाज बॉक्सर मोटरसायकल सापडली. हे झिशानची दुचाकी असल्याची ओळख पटल्यावर काही वेळाने झिशानला सुद्धा शोधण्यात जवानांना यश आले.

दरम्यान, पोलिसांना झिशान बेशुद्ध अवस्थेत सापडला होता, त्याच्यापाशी पॅनकार्ड, आधार, एटीएम कार्ड आणि मोबाईल हे सगळे प्रूफ सापडले होते. सुरक्षा एजेन्सी तर्फे या प्रकरणात तपास केला जात आहे.

2012 मध्ये महाराष्ट्रातील हमीद अंसारी या तरुणाने सुद्धा अशाच प्रकारे बेकायदेशीरपणे पाकिस्तान मध्ये प्रवेश केला होता त्याला सहा वर्षे पाकिस्तान मध्ये जेल मध्ये ठेवण्यात आले होते. झिशानला वेळेत जवानांनी थांबवले नसते तर त्यालाही हेच भोगावे लागले असते.