Karnataka: विजयपुरा येथील गोदामात मोठा अपघात; अंगावर मक्याच्या पोत्यांचा ढीग पडल्याने 8 कामगारांचा मृत्यू
अपघातात मृत्युमुखी पडलेले सर्व मजूर हे बिहारमधील असल्याचे सांगण्यात येत आहे. विजयपुराच्या बाहेरील अलीबाद येथील औद्योगिक वसाहतीत असलेल्या राजगुरू इंडस्ट्रीज या अन्न प्रक्रिया युनिटमध्ये सुमारे 50 कामगार काम करत होते. त्याचवेळी स्टोरेज युनिटचे चार संच कामगारांवर कोसळले.
कर्नाटकातील (Karnataka) विजयपुरा येथे काल मोठा अपघात झाला. या ठिकाणी एका खाजगी गोदामात काम करणाऱ्या कामगारांवर मक्याच्या पोत्यांचा ढीग पडला. पोत्यांखाली दबून आठ जणांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडला. यानंतर मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले. राजेश मुखिया (25), रामब्रिज मुखिया (29), शंभू मुखिया (26), राम बालक (52) आणि लखू (45) अशी पाच मृतांची नावे आहेत.
अपघातात मृत्युमुखी पडलेले सर्व मजूर हे बिहारमधील असल्याचे सांगण्यात येत आहे. विजयपुराच्या बाहेरील अलीबाद येथील औद्योगिक वसाहतीत असलेल्या राजगुरू इंडस्ट्रीज या अन्न प्रक्रिया युनिटमध्ये सुमारे 50 कामगार काम करत होते. त्याचवेळी स्टोरेज युनिटचे चार संच कामगारांवर कोसळले तेव्हा सुमारे 10 कामगार अडकले, प्रत्येकामध्ये 120 टन मका होता. अपघातानंतर विजयपुरा जिल्ह्याचे प्रभारी मंत्री एम बी पाटील मंगळवारी पहाटे बेळगावी येथून घटनास्थळी पोहोचले.
मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी पत्रकारांना सांगितले. पाटील म्हणाले की, गोदामात नेमके किती लोक दबले गेले आहेत हे सांगता येणार नाही. यामध्ये आठ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. पाटील म्हणाले, ‘हा अत्यंत दुःखद अपघात आहे. सध्या आमचे प्राधान्य मृतदेह बाहेर काढणे आणि त्यांचे शवविच्छेदन करणे आहे. स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधून मृतदेह आपापल्या राज्यात पाठवावे लागतील. गोदामाच्या मालकाची चूक असेल तर त्याचीही चौकशी होईल आणि कायद्यानुसार कारवाई केली जाईल.’ (हेही वाचा: Greater Noida Kidnapping Video: यूपीच्या ग्रेटर नोएडामध्ये विद्यार्थ्यांच्या दोन गटांमध्ये झालेल्या भांडणानंतर अपहरणाचा प्रयत्न, व्हिडिओ व्हायरल)
या घटनेची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली असल्याचे पाटील यांनी सांगितले. ते म्हणाले, कामगार दुसऱ्या राज्यातील आहेत. मानवतावादी आधारावर, आम्ही पीडित कुटुंबांना काही आर्थिक मदत देण्याचा प्रयत्न करू. तसेच नुकसान भरपाई देणे ही गोदाम मालकाची जबाबदारी आहे. या संदर्भातही पीडितांना भरपाई देण्यासाठी प्रयत्न केले जातील. या अपघातामध्ये जखमी झालेल्या कामगारांवर रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. याच गोदामात यापूर्वीही अशीच घटना घडली होती आणि त्यात दोन जणांचा मृत्यू झाला होता, मात्र त्यावेळी हे प्रकरण दडपण्यात आले. या प्रकरणाचीही चौकशी केली जाईल असे मंत्री म्हणाले.
(The above story first appeared on LatestLY on Dec 05, 2023 04:10 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

