
Andhra Pradesh Road Accident: आंध्र प्रदेश राज्य मार्ग परिवहन महामंडळाची (एपीएसआरटीसी) बस आणि रिक्षा यांच्यात झालेल्या भीषण अपघातात तीन महिलांचा मृत्यू झाला असून आठ जण जखमी झाले आहेत. रिक्षा चालक या महिलांना शेतात कामाला घेऊन जात असतांना आरटीसी बसने धडक दिल्याने हा अपघात झाला. ही धडक इतकी जोरदार होती की, तीन महिलांचा जागीच मृत्यू झाला. तर आठ जण गंभीर जखमी झाले. पोन्नूर ग्रामीण सर्कलचे इन्स्पेक्टर कोटेश्वर राव यांनी सांगितले की, चेब्रोलू पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
अपघाताचे कारण शोधण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जात आहे. मात्र, अपघाताचे नेमके कारण काय हे तपासानंतरच स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले. नीरुकोंडा गावातील मिरचीच्या शेतात मजुरांना घेऊन जाणाऱ्या रिक्षाला एपीएसआरटीसी बसने धडक दिल्याने हा अपघात झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. अरुणा, नचारम्मा आणि सीतारामम्मा अशी मृत महिलांची नावे असून त्या शुडापल्ली गाव, चेब्रोलू मंडल येथील रहिवासी होत्या. अपघातानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन जखमींना रुग्णालयात दाखल केले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.