जम्मू काश्मीरच्या इतिहासात सर्वात मोठी नोकर भरती; 50 हजार सरकारी पदे, अर्ज करण्यासाठी राज्यपालांचे तरुणांना आवाहन
File image of J&K Governor Satya Pal Malik | (Photo Credits: PTI)

मोदी सरकारने ऐतिहासिक निर्णय घेत जम्मू काश्मीरमधून (Jammu And Kashmir) 370 कलम हटवले. त्यानंतर अनेक घडामोडी घडल्या. पाकिस्तान अजूनही या धक्क्यातून सावरला नाही. आता काश्मीर खोऱ्यामध्ये सरकारी पदांवर (Government Job) तब्बल 50 हजार लोकांची नोकर भरती केली जाणार आहे. जम्मू-काश्मीरचे राज्यपाल (Governor) सत्यपाल मलिक (Satya Pal Malik) यांनी आज ही घोषणा केली आहे. आज काश्मीरमधील परिस्थितीची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यामध्ये ही माहिती देण्यात आली. या भरतीमध्ये तरुणांनी सहभागी व्हावे असे आवाहनही करण्यात आले आहे.

सत्यपाल मलिक यांचे ट्विट - 

याआधी कलम 370 मुले काश्मीरमध्ये त्या राज्यातील लोकांव्यतिरिक्त इतर कोणालाही नोकरी करण्यास परवानगी नव्हती. मात्र आता हे कलम रद्द झाल्याने आता भारतातील इतर लोकांसाठी जम्मू काश्मीरमध्ये नोकरीची कवाडे खुली झाली आहेत. आजच्या घोषणेमुळे या राज्याच्या इतिहासातील सर्वात मोठी नोकर भरती होणार आहे. या सर्व जागा सरकारी खात्यातील असणार आहेत. या भरतीशिवाय केंद्र सरकारकडून लष्कर, निमलष्करी दलाची वेगळी भरती होणार आहे. (हेही वाचा: सुप्रीम कोर्टाने अनुच्छेद 370 याचिके संदर्भातील निर्णय संविधान पीठाकडे सोपवले, ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणार सुनावणी)

येत्या दोन ते तीन महिन्यामध्ये ही भरती होणार आहे. यासंदर्भात इतर माहिती लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे. सध्या केंद्र सरकार काश्मीरच्या विकासावर लक्ष केंद्रित करत आहे. आतापर्यंत ज्या सोई-सुधारणा इथल्या नागरिकांनी अनुभवल्या नव्हत्या त्यांना त्या आता उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. या दृष्टीने येत्या दोन दिवसांमध्ये राज्याच्या विकासाबाबत काही मोठ्या घोषणाही करण्यात येणार आहेत. सध्या जम्मू मधील सर्व 10 जिल्ह्यांमधील मोबाईल सेवा सुरु झाली आहे. हळूहळू इंटरनेट सेवाही पूर्वपदावर आणण्याचे आश्वासन सत्यपाल मलिक यांनी आजच्या पत्रकार परिषदेत देण्यात आले.