Rahul Gandhi | (Photo Credit- Facebook)

Congress Party News: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 (Maharashtra Assembly Elections 2024) मध्ये झालेल्या कथीत धांदलीबद्दल लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी () आणि काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या वादानंतर (Election Commission Controversy) निवडणूक आयोगाने गांधी आणि काँग्रेसला चर्चेसाठी आमंत्रण दिल्यानंतर पक्षाने गुरुवारी अधिकृत पत्र पाठवत प्रतिक्रिया दिली आहे. या पत्रात काँग्रेस पक्षाने महाराष्ट्र आणि हरियाणा राज्यांतील निवडणूक प्रक्रियेचा सखोल अभ्यास करण्यासाठी, मशीन-रीडेबल डिजिटल मतदार यादी (Maharashtra Voter List) आणि मतदानादिवशीच्या व्हिडीओ फुटेजची मागणी केली आहे. काँग्रेसने मागणी केली आहे की ही माहिती एका आठवड्याच्या आत उपलब्ध करून द्यावी.

काँग्रेसचे आयोगाला पत्र

काँग्रेसने आयोगाला पाठविलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे, मशीन-रीडेबल, डिजिटल स्वरूपातील महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मध्ये मतदार यादी तसेच महाराष्ट्र आणि हरियाणामधील मतदानाच्या दिवशीचे व्हिडीओ फुटेज आम्हाला या पत्राच्या तारखेपासून एका आठवड्यात द्यावे. ही आमची दीर्घकालीन मागणी आहे आणि निवडणूक आयोगासाठी ती पूर्ण करणे सहज शक्य आहे. ही माहिती मिळाल्यानंतर काँग्रेस पक्षाची वरिष्ठ नेतेमंडळी EC शी प्रत्यक्ष भेट घेऊन आपले विश्लेषण सादर करतील. (हेही वाचा, EC On Voting CCTV Footage: निवडणूक आयोगाने राहुल गांधींची मागणी केली अमान्य! मतदान केंद्राचा व्हिडिओ प्रसिद्ध करण्यास दिला नकार)

'सत्य सांगणे' हीच EC ची विश्वासार्हता टिकवण्याची किल्ली

काँग्रेस प्रवक्ते पवन खेऱा यांनीही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे ट्विटर) वरून हीच मागणी पुन्हा मांडली. त्यांनी म्हटले, ही मागणी जुनी असून निवडणूक आयोगाने ती पूर्ण करणे अपेक्षित आहे. या मागणीमागील पार्श्वभूमी ही आहे की, राहुल गांधी यांनी यापूर्वीच निवडणूक आयोगाला सर्व राज्यांच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी संकलित, डिजिटल आणि मशीन-रीडेबल मतदार यादी जाहीर करण्याचे आवाहन केले होते. त्यांनी सांगितले होते की 'सत्य सांगणे' हीच EC ची विश्वासार्हता टिकवण्याची किल्ली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात घोळ?

राहुल गांधी यांनी एका वृत्तांताचा हवाला देत सांगितले होते की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात अवघ्या 5 महिन्यांत मतदारसंख्या 8% ने वाढली. काही मतदान केंद्रांवर 20% ते 50% पर्यंतची वाढ झाली होती. BLO (बूथ लेव्हल अधिकारी) यांनी अनोळखी व्यक्ती मतदान करत असल्याची माहिती दिली होती. तसेच हजारो मतदारांचे पत्ते पडताळणीअभावी अपूर्ण असल्याचे माध्यमांनी उघड केले आहे.

पवन खेरा यांच्याकडून पत्र सामायिक

'मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात 5 महिन्यांत मतदारसंख्येत 8% वाढ'

गांधी यांनी X वर पोस्ट करत म्हटले, महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात 5 महिन्यांत मतदारसंख्येत 8% वाढ झाली. काही बूथवर ही वाढ 20% ते 50% पर्यंत होती. BLOs ने अनोळखी लोकांनी मतदान केल्याचे नमूद केले. हजारो मतदारांकडे सत्यापित पत्ता नव्हता. आणि निवडणूक आयोग? मौन – की सहभाग? हे तांत्रिक बिघाड नाहीत, ही मतांची चोरी आहे. आणि हीच गोष्ट झाकण्याचा प्रयत्न म्हणजेच कबुली.

दरम्यान, या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगावर दबाव वाढवला आहे. मतदार यादी आणि मतदान प्रक्रियेतील पारदर्शकतेबाबत सार्वजनिक आणि राजकीय चर्चेला पुन्हा उधाण आले आहे. न्यायालयांमध्ये याचिकाही दाखल झाल्या आहेत.