Work From Home Norms: IT, BPO कर्मचार्‍यांना 31 डिसेंबर 2020 पर्यंत 'वर्क फ्रॉम होम' करण्याला केंद्र सरकार कडून नियमांमध्ये शिथिलता
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: Pexels)

भारतामध्ये दिवसागणिक कोरोनाची स्थिती बिकट होत असताना आता शक्य असेल त्यांना वर्क फ्रॉम होम करण्याचे आवाहन सरकारकडून करण्यात येत आहे. दरम्यान आय टी क्षेत्रातील कंपन्यांच्या कर्मचार्‍यांना आता वर्क फ्रॉम होम (Work From Home) करण्याची मुभा 31 डिसएंबर पर्यंत वाढवल्याची माहिती भारत सरकार कडून करण्यात आली आहे. तशी घोषणा काल (21 जुलै) करण्यात आली आहे. त्यामुळे आता देशभरातील आयटी आणि बीपीओ कंपन्यांचे कर्मचारी 31 डिसेंबर 2020 पर्यंत घरून काम करू शकणार आहे. यापूर्वी ही मुदत 31 जुलै पर्यंतच देण्यात आली होती. मात्र आता सरकारने त्यामध्येही पुढे 5 महिन्यांची वाढ केली आहे.

DoT India या सरकारच्या अधिकृत ट्वीटर अकाऊंटवरून याबद्दल माहिती देण्यात आली आहे. देशातील कोविड 19ची स्थिती पाहता आता वर्क फ्रॉम होमच्या नियमांमध्ये शिथीलता देत बीपीओ आणि आयटी क्षेत्रातील कर्मचार्‍यांना 31 डिसेंबर पर्यंत वर्क फ्रॉम होम करण्याची मुभा असेल.

भारतामध्ये प्रामुख्याने बंगळुरु, हैदराबाद, मुंबई, दिल्ली एनसीआर, पुणे येथे आयटी हब आहेत. दरम्यान दिवसागणिक आता देशात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. अशामध्ये तंत्रज्ञान आणि माहिती क्षेत्रातील व्यवहार, कामकाज सुरळीत सुरू रहावे याकरिता आता केंद्र सरकारने नियमांमध्ये शिथीलता देत पुढील 5 महिने कर्मचार्‍यांना वर्क फ्रॉम होम करण्याची मुभा दिली आहे.

वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता आता सुरूवातीला 30 एप्रिल त्यानंतर 31 जुलै पर्यंत वर्क फ्रोम होमची डेडलाईन वाढवण्यात आली होती. आता त्यामध्ये पुन्हा 5 महिन्यांची मुदतवाढ आहे.