Coronavirus Outbreak in India: भारतात गेल्या 24 तासांत कोरोना व्हायरस बाधित 540 नव्या रुग्णांची भर तर 17 जणांचा मृत्यू; देशातील कोरोना बाधितांचा आकडा 5734 वर
Coronavirus | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

देशातील कोरोना व्हायरस (Coronavirus) बाधितांचा आकडा सातत्याने वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 540 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोना बाधितांचा आकडा 5734 वर पोहचला आहे. तर 17 जणांचा यात मृत्यू झाला आहे. दरम्यान बरे झालेल्या 473 लोकांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर देशात आतापर्यंत 166 कोरोना बाधितांना आपले प्राण गमवावे लागले असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. तरी देखील कोरोनाच्या रुग्णसंख्येत पडणारी भर आणि त्यामुळे जाणारे बळी यामुळे नागरिक चिंतेत आहेत. मात्र कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. कोरोनाचे रुग्ण आढळलेली ठिकाणं, रुग्णालयं सील करण्यात आली आहेत. तर आरोग्य सुविधा पुरवण्यावर विशेष भर देण्यात येत आहे. तसंच नागरिकांनाही सोशल डिस्टसिंगसह स्वच्छता पाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे. (मुंबई पाठोपाठ नवी दिल्लीतही मास्क घालणे बंधनकारक, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिले आदेश)

ANI Tweet:

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन वाढणार का? असा प्रश्न अनेक देशवासियांच्या मनात आहे. दरम्यान राज्य किंवा केंद्र सरकारकडून याबाबत कोणतेही स्पष्ट संकेत देण्यात आलेले नाहीत. मात्र कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी लॉकडाऊन वाढवला जाईल, अशी चर्चा सर्वत्र रंगू लागली आहे. 11 एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत. त्यात लॉकडाऊनबद्दलचा निर्णय घेण्यात येईल, असे म्हटले जात आहे.