Coronavirus Outbreak: कोरोना व्हायरसच्या रुग्णांचा आकडा वाढला; देशात 23,077 रुग्ण, 718 जणांचा मृत्यू
प्रतीकात्मक फोटो | (Photo Credits: File Image)

देशातील कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) रुग्णांचा आकडा आज 23 हजाराच्या पार गेला आहे, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, मागील 24 तासात, 1684 प्रकरणे आणि 37 मृत्युंची नोंद झाली आहे, यानुसार आतापर्यंत कोरोनाचे 23,077 रुग्ण देशात आढळले आहेत. ही आज, 24 एप्रिल 2020 च्या सकाळी 8 वाजेपर्यंतची आकडेवारी आहे. यानुसार, सद्य घडीला कोरोनाच्या 17610 रुग्णांवर उपचार सुरु आहेत, 4749 जण बरे झाले आहेत तर 718 जणांचा मृत्यू झाला आहे, तर एक रुग्ण हा स्थलांतरित आहे. कोरोनाचा सर्वात मोठा फटका बसलेल्या महाराष्ट्रात सुद्धा काल, म्हणजेच गुरुवारी 23 एप्रिल रोजी कोरोनाचे 778 नवे रुग्ण आढळले, तर 14 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात कोरोना बाधितांचा आकडा 6430  वर पोहचला आहे. यामध्ये एकट्या मुंबईतच कोरोनाचे 4,232 रुग्ण आढळले आहेत. कोरोना व्हायरसचे ताजे अपडेट जाणुन  घेण्यासाठी क्लिक करा. 

प्राप्त माहितीनुसार, कोरोनाच्या रुग्णांची देशातील आकडेवारी महाराष्ट्राच्या पाठोपाठ गुजरात (2624 रुग्ण), दिल्ली ( 2376 रुग्ण) , राजस्थान (1964 रुग्ण) या राज्यात सुद्धा चिंतेचे वातावरण आहे. दुसरीकडे,कालपासून केंद्र सरकारच्या वतीने देशातील आणखीन काही उद्योगांना लॉक डाऊन काळात काम करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे आजपासून पुन्हा काही ठिकाणी उद्योग सुरु होतील, मात्र यावेळी सर्वांना स्वतःच्या व इतरांच्या सुरक्षेची काळजी घेणे आवश्यक असणार आहे, विनाकारण गर्दी केल्यास ही परिस्थिती आणखीन बिघडू शकते.

पहा ट्विट

दरम्यान, कोरोना व्हायरसचे संकट दिवसागणिक वाढतच असताना आता एक अत्यंत दिलासादायक वृत्त समोर येत आहे, कोरोना व्हायरसच्या विळख्यातून आणखीन एक राज्याची सुटका झाली आहे. हे राज्य म्हणजे त्रिपुरा. मुख्यमंत्री बिपलब कुमार देब (Biplab Kumar Deb) यांच्या माहितीनुसार, कोरोनाचे दोन रुग्ण या राज्यात होते. हे कोरोनाचे दोन्ही रुग्ण बरे झाल्याने त्रिपुरा राज्य आता कोरोनमुक्त झाले आहे