Lockdown in Maharashtra: महाराष्ट्रात लॉकडाऊन? आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे महत्त्वाचे विधान
Rajesh Tope | (Photo Credits: Facebook)

कोरोना व्हायरस (Coronavirus) संक्रमितांची वाढती संख्या विचारात घेता महाराष्ट्रात पुन्हा एकदा लॉकडाऊन (Lockdown) लावावा असे सरकारच्या विचाराधीन आहे. अद्याप यावर निर्णय झाला नाही. परंतू, गरज पडल्यास लॉकडाऊनला (Lockdown in Maharashtra) सामारे जाण्यास सज्ज राहा असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी प्रशासनाला दिला आहे. दरम्यान, लॉकडाऊन लागू करण्यास विरोधी पक्षांचा तीव्र विरोध आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात खरोखर लॉकडाऊन लागू होणार का? याबाबत संभ्रम आहे. यावर राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी महत्त्वपूर्ण विधान केले आहे.

राजेश टोपे यांनी सांगितले की, लॉकडाऊन कोणालाच नको आहे. राज्य सरकारचीही ती इच्छा नाही. परंतू, उपलब्ध साधनसूविधा, त्यांची क्षमता या सर्व बबींचा विचार करावा लागतो. तहाण लागल्यावर विहीर खणून चालत नाही. त्यासाठी तयारी करावी लागते. अभ्यास करावा लागतो. आयत्या वेळी लॉकडाऊन लागू करणे शक्य होणार नाही. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वरीष्ठ अधिकाऱ्यांबाबत चर्चा केली. लॉकडाऊन लागू केला जाणार नाही असाच सर्वांचा प्रयत्न आहे, असेही राजेश टोपे यांनी म्हटले आहे. (हेही वाचा, MNS: 'लॉकडाऊन लावण्याबाबत मनसेने सरकारकडे केली 'ही' मागणी)

मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनीही लॉकडाऊनबाबत भाष्य केले. लॉकडाऊन लागू करण्याबाबत राज्य सरकारचा तूर्तास तरी कोणताही विचार नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊनला सामोरे जाण्याची तयारी ठेवा किंवा तयारी करा असे म्हटले आहे. याचा अर्थ लॉकडाऊ लागू झाला असा नव्हे. जर लॉकडाऊनसारखा निर्णय घ्यावा लागलाच तर त्या वेळी काय करावे लागेल यावर केलेला तो विचार आहे. नागरिकांनी प्रामाणिकपणे कोरोना नियमांचे पालन केले तर लॉकडाऊन लावण्याची गरज भासणार नाही,असेही अस्लम शेख यांनी म्हटले.

दरम्यान, अल्पसंख्याकमंत्री नबाब मलिक यांनी सुरुवातीला लॉकाडाऊन लागू न करता उपाययोजनांवर भर देण्यात यावा असे आम्ही मुख्यमंत्र्यांना सांगितल्याचे म्हटले होते. मात्र, त्यानंतर जलसंपदामंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाशी चर्चा करुनच निर्णय घेतात. जर लोकांनी नियम पाळले नाहीत. कोरोना रुग्णांची संख्या अशीच वाढत राहीली तर लॉकाडाऊन लावावा लागेल, असे म्हटले.

दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले की लॉकाडाऊनला आमचा विरोध आहे. पण तरीही सरकार लॉकाऊन लावणार असेलच तर जरूर लावा .परंतू, जो कष्टकरी वर्ग आहे त्यांना महिन्याला पाच हजार रुपये सरकारने द्यावेत आणि खुशाल लॉकडाऊन लागू करावा. आमचा पाठिंबा आहे, असे पाटील यांनी म्हटले आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनीही लॉकडाऊ केला तर लोक रस्त्यावर उतरतील असे म्हटले आहे.