भारतात कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या दिलासादायक, मागील 24 तासांत 5,355 रुग्णांची प्रकृती सुधारली; देशातील रिकव्हरी रेट 48.27%- आरोग्य मंत्रालयाची माहिती
Coronavirus | (Photo Credits: Pixabay)

भारतात कोरोना व्हायरसचा (Coronavirus) शिरकाव झाल्यानंतर हळूहळू कोविड-19 (Covid-19) प्रसार वाढत गेला. मागील दोन महिन्यांपासून देशातील कोरोना बाधितांचा आकडा सातत्याने वाढत आहे. त्यामुळे साहजिकच नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. परंतु, देशातील कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या चांगली असून रिकव्हरी रेट दिलासादायक असल्याची माहिती समोर आली आहे. आरोग्य मंत्रालयाने (Health Ministry) दिलेल्या माहितीनुसार, मागील 24 तासांत 5,355 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत देशात एकूण 1,09,462 कोरोना संसर्गातून पूर्णपणे बरे झाले आहेत. दरम्यान देशातील रिकव्हरी रेट 48.27% इतका आहे. तसंच देशात कोविड-19 च्या 1,10,960 अॅक्टीव्ह केसेस असून हे सर्व रुग्ण वैद्यकीय निगराणी खाली आहेत. (Coronavirus: भारतात कोरना व्हायरस चाचणीसाठी गेल्या 24 तासात 1,43,661 तर आतापर्यंत एकूण 43,86,376 नमूने तपासले- आयसीएमआर)

कोरोना बाधितांच्या संख्येत महाराष्ट्र राज्य प्रथमस्थानी असल्याचे सर्वच जाणतात. त्यानंतर दिल्ली, तामिळनाडू, गुजरात, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश या राज्यांमध्येही कोरोनाग्रस्तांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे राज्य आणि केंद्र सरकार कोरोना विषाणूंचा संसर्ग थोपवण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

ANI Tweet:

देशातील कोरोना बाधितांचा आकडा 226770 वर पोहचला असून 6348 आतापर्यंत मृत्यू झाला आहे. तर 109462 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान 110960 रुग्णांवर अजूनही उपचार सुरु आहेत. या रुग्णसंख्येत दिवसागणित मोठी भर पडत असली तर त्यातून बरे होणाऱ्यांची संख्याही दिलासादायक आहे. दरम्यान लॉकडाऊनच्या 5 व्या टप्प्यात अनेक बाबतीत मुभा देण्यात आली असली तरी कोविड-19 चे संकट परतवून लावण्याचे मोठे आव्हान आपल्यासमोर आहे. त्यामुळे आवश्यक ती खबरदारी घेणे अत्यंत गरजेचे आहे.