Coronavirus in India: भारतातील कोरोना बाधितांचा आकडा 7,42,417 वर; मागील 24 तासांत 22,752 नव्या रुग्णांची वाढ तर 482 जणांचा मृत्यू
Coronavirus (Photo Credits: PTI)

भारतात कोरोना व्हायरसचा (Coronavirus) उद्रेक सुरुच आहे. कोरोना बाधितांची संख्या दिवसागणित वाढत आहे. मागील 24 तासांत 22,752 नव्या रुग्णांची भर पडली असून 482 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नव्या भरीमुळे देशातील कोरोना बाधितांचा आकडा 7,42,417 वर पोहचला आहे. त्यापैकी 2,64,944 रुग्णांवर सध्या उपचार सुरु असून 4,56,831 रुग्णांची प्रकृती उपचारानंतर सुधारली आहे. तर 20,642 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने (Ministry of Health & Family Welfare) दिली आहे. दरम्यान रुग्णसंख्या दिवसागणित वाढत असली तरी कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्याही चांगली आहे. सध्या भारतात 2,64,944 अॅक्टीव्ह केसेस असून 4,56,831 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

कोरोना व्हायरसचे संकट महाराष्ट्र, तामिळनाडू, दिल्ली येथे दाट आहे. त्यापाठोपाठ कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा या राज्यांमध्ये कोरोना बाधितांची संख्या अधिक आहे. ठोस औषध किंवा लस उपलब्ध होत नाही तोपर्यंत कोविड-19 चे संकट कायम राहणार आहे. दरम्यान अनलॉक 2 च्या माध्यमातून जनजीवन पुन्हा एकदा रुळावर आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. (महाराष्ट्रात कोरोनाचा कहर सुरुच; राज्यात दिवसभरात 5134 रुग्णांची नोंद, 224 मृत्यू)

ANI Tweet:

महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची संख्या 217121 वर पोहचली असून 118558 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 89294 रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. राज्यात एकूण 9250 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात अनलॉक 2 सुरु असलं तरी ठाणे, कल्याण-डोबिंवली, नवी मुंबई यांसारखी शहरं पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्यात आली आहेत. तसंच कोविड-19 संसर्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी नवनवीन उपाययोजना राज्यात राबवण्यात येत आहेत.