Madhya Pradesh Accident: मध्य प्रदेशातील सिधी येथे SUV आणि ट्रकच्या धडकेत 8 जणांचा मृत्यू, तर 13 जण जखमी

रविवारी रात्री उशिरा सिटी कोतवाली पोलिस स्टेशन हद्दीतील राष्ट्रीय महामार्गावरील ओपनी पेट्रोल पंपाजवळ हा अपघात झाला. एका भरधाव ट्रक आणि एसयूव्हीची समोरासमोर धडक झाली.

Madhya Pradesh Accident: मध्य प्रदेशातील सिधी येथे SUV आणि ट्रकच्या धडकेत 8 जणांचा मृत्यू, तर 13 जण जखमी
Sidhi Road Accident (फोटो सौजन्य - PTI)

Madhya Pradesh Accident: मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) सिधी जिल्ह्यात (Sidhi District) झालेल्या एका भीषण रस्ते अपघातात (Accident) आठ जणांचा मृत्यू झाला तर 13 जण जखमी झाले. रविवारी रात्री उशिरा सिटी कोतवाली पोलिस स्टेशन हद्दीतील राष्ट्रीय महामार्गावरील ओपनी पेट्रोल पंपाजवळ हा अपघात झाला. एका भरधाव ट्रक आणि एसयूव्हीची समोरासमोर धडक झाली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या नऊ जणांना चांगल्या उपचारांसाठी रेवा येथे रेफर करण्यात आले, तर उर्वरित लोकांवर सिधी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

प्राप्त माहितीनुसार, एसयूव्हीमधील सर्व 21 जण बहरी पोलिस स्टेशन हद्दीतील पडरिया, मटिहानी आणि देवरी गावातील रहिवासी होते. ते त्याच्या मुलांचा मुंडन समारंभ करण्यासाठी मैहर मंदिरात जात होते. पण हा प्रवास त्याच्यासाठी शेवटचा ठरला. या अपघातात सोबत नेण्यात येत असलेल्या एका बकरीचाही मृत्यू झाला. (हेही वाचा - Pune Road Accident: मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर अपघाताचा थरार; भरधाव कार दुचाकीवर आदळली अन् दोघेही फरफटत गेले (Video))

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा भीषण अपघात पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास घडला. ही टक्कर इतकी भीषण होती की एसयूव्हीमधील सात जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एकाने रुग्णालयात उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली. स्थानिक लोक आणि पोलिसांनी जखमींना तातडीने रुग्णालयात नेले. (हेही वाचा - Nagpur Accident: नागपूरमध्ये बस आणि ट्रकच्या धडकेत 4 ठार, 20 जण जखमी)

ट्रक चालकाला अटक, चौकशी सुरू -

सिद्धी पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले असून अपघाताचा सखोल तपास सुरू आहे. अपघातामागील कारणे तपासली जात आहेत, हा अपघात निष्काळजीपणे गाडी चालवल्यामुळे झाला की आणखी काही कारण होते, याचा तपास पोलिस करत आहेत. या अपघाताने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. या अपघातामुळे संपर्ण गावात शोककळा पसरली आहे.

डीएसपी गायत्री तिवारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व मृतांचे मृतदेह शवविच्छेदनानंतर त्यांच्या कुटुंबियांना सोपवण्यात आले आहेत. प्रशासनाने बाधित कुटुंबांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. रस्ते अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री स्वेच्छा अनुदानातून प्रत्येकी 2 लाख रुपये, गंभीर जखमींना प्रत्येकी 1 लाख रुपये आणि सामान्य जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपये आर्थिक मदत मंजूर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

(The above story first appeared on LatestLY on Mar 10, 2025 12:43 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).