चाइल्ड पोर्नोग्राफी प्रकरणी साकीनाका येथून एका भाजी विक्रेत्याला अटक करण्यात आली आहे. हरिप्रसाद पटेल, असे या भाजी विक्रेत्याचे नाव आहे.  

अमरावतीत शहरातील 10 सावकारांच्या घरी सहकार खात्याच्या विशेष पथकांनी छापे मारले आहेत. या कारवाईत 18 लाख 88 हजार रुपये रोख, धनादेश आदी कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.  

कोरोना व्हायरसमुळे राज्यात चिकनचा खप 300 टनांनी घटला आहे. चिकनमधून कोरोना व्हायरसचा संसर्ग होत असल्याच्या अफवा सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यामुळे राज्यातील पोल्ट्री उद्योगाला फटका बसला आहे. 

केंद्रातील मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर अरविंद सावंत यांना राज्यातील मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे. अरविंद सावंत यांची राज्यातील संसदीय सदस्य समितीचे अध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
अरविंद सावंत यांची संसदीय सदस्य समितीचे अध्यक्ष नेमणूक
 

वाराणसीत एकाच कुटुंबातील 4 जणांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कर्जामुळे त्रस्त झालेल्या एका व्यावसायिकाने पत्नी, मुलगा आणि मुलगी यांची हत्या करुन स्वत: आत्महत्या केली आहे. विशेष म्हणजे मृत्यू होण्यापूर्वी व्यावसायिकाने पोलिसांना फोन करुन याबाबत माहिती दिली होती.  

कळना येथे रेल्वे रुळांशेजारी कचऱ्याला लागलेल्या आगीमुळे वृद्ध महिलेला हृदयविकाराचा झटका आला आहे. या आगीमुळे खबरदारीचा उपाय म्हणून मध्य रेल्वेची ठाणे-कल्याणदरम्यानची धीम्या मार्गावरील लोकल वाहतूक बंद करण्यात आली होती. दरम्यान, खोळंबलेल्या लोकलमधील प्रवाश्यांचा गर्दीत बसलेल्या एका वृद्ध महिलेला हृदयविकाराचा झटका आला. या महिलेला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या या महिलेची प्रकृती स्थिर आहे.   

जपानमधील योकोहामा बंदरावर उभ्या असलेल्या 'डायमंड प्रिन्सेस' क्रूझवरील  कोरोनाच्या रुग्णात दिवसेंदिवस वाढ होत आहे. या क्रूझवरील एका भारतीय नागरिकाला कोरोनाचा संसर्ग झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

पाकिस्तानी सैन्याने पूंछ सेक्टरमध्ये पुन्हा एकदा शस्रसंधीचं उल्लंघन केलं आहे. या गोळीबाराला भारतीय जवानांनी चोख प्रत्युतर दिलं. मात्र, या चकमकीत एका नागरिकाचा मृत्यू झाला आहे. तसेच चार जण जखमी झाले आहेत. पुलवामा हल्ल्याची आज वर्षपूर्ती असताना पाकने गोळीबार केल्याने सीमा भागात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.  

काँग्रेस आमदाराकडून महिला IPS अधिकाऱ्याला धमकी देण्यात आली आहे. तुला तुझी लायकी दाखवते या शब्दांत आमदाराने महिला पोलिस अधिकाऱ्याला धमकी दिली आहे. या वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. छत्तीसगडमधील कसडोलच्या काँग्रेस महिला आमदाराने 'तुला तुझी लायकी दाखवून देईन,' अशा भाषेत महिला आयपीएस अधिकाऱ्याला धमकावले आहे.  

औरंगाबादचं नाव कोणत्याही क्षणी संभाजीनगर होऊ शकतं, असं शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबादकरांना कधीही सरप्राईज देतील. उद्धव ठाकरेंनी हा निर्णय घेतल्यानंतर त्यांना काँग्रेस किंवा राष्ट्रवादी कोणीही विरोध करणार नाही, असंही खैरे यांनी स्पष्ट केलं. 

Load More

महाराष्ट्र, भारतच नव्हे तर जगभरातील अनेक लोकांसाठी आजचा दिवस खास आहे. आज 14 फेब्रुवारी आहे. 14 फेब्रुवारी म्हणजे प्रेमिकांच्या आवडीचा खास दिवस. बोले तो व्हॅलेंटाईन डे (Valentine's Day 2020) . व्हॅलेंटाईन डे निमित्त जगभरातील जोडपी, प्रेमी युगुलं आणि लहान थोर मंडळी आपापल्या परीने हा प्रेमाचा दिवस साजरा करतात. भारतातही लव्हबर्ड्स आज हा दिवस साजरा करत आहेत. अर्थात व्हॅलेंटाईन उत्साहाने साजरा होत असेला तरी त्याला विरोध करणाऱ्यांचीही संख्या कमी नाही. अनेक संस्था, संघटना आणि राजकीय पक्ष व्हॅलेंटाईनला विरोध करतात. त्यामुळे व्हॅलेंटाईन साजरा केल्याच्या आणि त्याला होणाऱ्या विरोधाच्या घटना, घडामोडी यांवर आज लेटेस्टली नजर ठेऊन असणार आहे.

अवघे जग व्हॅलेंटाईन साजरा करत आहे. दरम्यान, भारतात हा दिवस आणखीही एका कारणासाठी महत्त्वाचा आहे. पुलवामा हल्ला ( Pulwama Attack Anniversary) घटनेला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. त्यामुळे अवघा देश आज पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करत आहे. असे असले तरी, पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या हौतात्म्याचा सरकारला आणि विविध संस्थांना विसर पडल्याचेही या निमित्ताने पुढे आले आहे. प्रसारमाध्यमांनी वृत्त दिले आहे की, पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या शहिदांच्या कुटुंबीयांना अद्यापही मदत मिळाली नाही. शहीदांच्या कुटुंबीयांना पाच एकर जमीन देण्याचा सरकारचा वादाही केवळ कागदावरच राहिला आहे. त्यामुळे आज राज्य अथवा केंद्र सरकार या निमित्ताने काही विशेष घोषणा करते का याकडेही लक्ष असणार आहे. (हेही वाचा, Pulwama Attack Anniversary: पुलवामा दहशतवादी हल्ल्याला 1 वर्षे पूर्ण; अजूनही ताज्या आहेत जखमा, ज्याने देशाचा चेहरामोहरा बदलला)

दरम्यान, दुसऱ्या बाजूला दिल्ली विधानसभा निवडणुकीत दणकूण झालेला पराभव भाजपच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. त्यामुळे या पराभवावर भाजपच्या गोटात मंथन सुरु झाले आहे. याचे प्रत्यंतर केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष अमीत शाह यांच्या विधानात येते. भाजप नेत्यांच्या प्रक्षोभक विधानांमुळेच दिल्ली विधानसभा निवडणुकीत फटका बसल्याचे अमित शाह यांनी म्हटले आहे. तसेच, दिल्लीत आपला पराभव झाल्याची कबुलीही अमित शाह यांनी दिली आहे.

दरम्यान, वरील सर्व मुद्द्यांसह अर्थव्यवस्था, कोरोना व्हायरस (Coronavirus), जागतिक राजकारण, समाजकारण, अर्थकारण, दळणवळण आदी क्षेत्रातही काय घटना घडामोडी घडातत यावर लेटेस्टली मराठी नजर ठेऊन असणार आहे. म्हणून आज दिवसभरातील घटना आणि घडामोडी जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी लाईव्ह ब्लॉग अपडेट्स सोबत जोडलेले राहा.